शिवसेनेच्या प्लास्टिक बंदीला केंद्राचा खो, थेट अमित शाहांचा हस्तक्षेप?
मुंबई : राज्य सरकारने घेतलेल्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची केंद्र सरकारकडून समिक्षा करण्यात येणार आहे. नामवंत शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने 11 जणांच्या समितीची नियुक्ती नेमली आहे. ही समिती पुढच्या दोन महिन्यात महाराष्ट्रातल्या प्लास्टिक बंदीबाबत निर्णय देणार आहे. केंद्र सरकारच्या केमिकल अँड पेट्रोकेमिकल विभागाने याबाबत आदेश काढला आहे. दोन महिन्यात सिंगल युज प्लास्टिकबद्दल […]
मुंबई : राज्य सरकारने घेतलेल्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची केंद्र सरकारकडून समिक्षा करण्यात येणार आहे. नामवंत शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने 11 जणांच्या समितीची नियुक्ती नेमली आहे. ही समिती पुढच्या दोन महिन्यात महाराष्ट्रातल्या प्लास्टिक बंदीबाबत निर्णय देणार आहे.
केंद्र सरकारच्या केमिकल अँड पेट्रोकेमिकल विभागाने याबाबत आदेश काढला आहे. दोन महिन्यात सिंगल युज प्लास्टिकबद्दल निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्रात प्लास्टिकचा व्यवसाय करणाऱ्या गुजरातच्या व्यापाऱ्यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याकडे धाव घेतली होती. सूत्रांच्या माहितीनुसार अमित शाह यांच्या सूचनेनुसार ही समिती नेमण्यात आली आहे.
प्लास्टिक बंदीनंतर गुजरातमधील अनेक व्यापारी अडचणीत आले होते, शिवाय कंपन्यांनाही तोटा झाला होता. या व्यापाऱ्यांनी थेट अमित शाहांकडे आपलं गाऱ्हाणं मांडलं. त्यामुळे या निर्णयाची समिक्षा करण्यासाठी अमित शाहांनीच पुढाकार घेतला असल्याचं बोललं जातंय.
प्लास्टिक बंदीच्या निर्णयावेळी सरकारमध्येच दोन गट असल्याचं चित्र होतं. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला होता. स्वतः युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे प्लास्टिक बंदीसंदर्भातल्या अनेक बैठकांना उपस्थित होते. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी अनेक महत्त्वाचे निर्णयही घेतले होते.
केंद्राकडून होणाऱ्या या समिक्षेच्या निर्णयामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातले संबंध आणखी बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिवसेना प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची आणखी प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी काय प्रयत्न करते, शिवाय केंद्र सरकारची समिती काय अहवाल देते याकडे लक्ष लागलंय.