मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पहिल्यांदाच ‘वर्षा’ बंगल्यात मुक्काम, कुटुंबासह तीन दिवस ‘वर्षा’त वास्तव्य
गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्री शासकीय कामकाज आणि बैठकांसाठी 'वर्षा'वर जायचे. पण आता पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी तीन दिवस कुटुंबासह वर्षावर वास्तव्य केलं.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर कुटुंबासह मुक्काम केला. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीचा मुहूर्त साधत त्यांनी वर्षावर तीन दिवस मुक्काम केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी शनिवार ते मंगळवार दरम्यान ‘वर्षा’ बंगल्यावर मुक्काम केला (CM Uddhav Thackeray stayed at Varsha Bungalow from last three days).
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानी वास्तव्यास आहेत. गेल्या वर्षभरापासून ते मातोश्री बंगल्यातूनच सर्व कार्यभार सांभाळत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी त्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्याचं नूतनीकरण केलं. या वास्तूरचनेत काही बदल केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबासह वर्षावर वास्तव्य केलं.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर राहायला जाणार का? याबाबत अनेक तर्क लढवले जात होते. गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्री शासकीय कामकाज आणि बैठकांसाठी ‘वर्षा’वर जायचे. पण आता पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी तीन दिवस कुटुंबासह वर्षावर वास्तव्य केलं (CM Uddhav Thackeray stayed at Varsha Bungalow from last three days).
‘मातोश्री’सोबत शिवसैनिकांचा जिव्हाळ्याचा संबंध
शिवसैनिकांचा ‘मातोश्री’सोबत जिव्हाळ्याचा संबंध आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं ते खासगी निवासस्थान आहे. या बंगल्याशी शिवसैनिकांच्या अनेक भावना जोडल्या आहेत. शिवसैनिकांसाठी सेनाभवननंतर मातोश्री हे श्रद्धास्थान आहे. कारण या वास्तूत दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं वास्तव्य होतं. बाळासाहेब ठाकरे हयात असताना देशातील दिग्गज नेते त्यांना मातोश्रीवर भेटायला यायचे. मातोश्रीचं महत्त्व लक्षात घेता मुख्यमंत्री खरच मातोश्री सोडून वर्षा निवासस्थानी वास्तव्यास जाणार का? अशी चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनल्यानंतरही वर्षा निवासस्थानी वास्तव्यास गेलेले नाहीत. मात्र, त्यांनी कुटुंबासह शनिवार ते मंगळवार या गेल्या तीन दिवसात वर्षा बंगल्यावर मुक्काम केल्याने राजकीय वर्तुळात या विषयी चर्चा रंगली आहे.
हेही वाचा : काँग्रेस 14 महिन्यांपूर्वी सोडली, पण राजकारण नाही, जमिनीवर उतरुन तळागळात पोहोचायचंय : उर्मिला मातोंडकर