Cold wave | उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट, अक्कलकुवा 3 अंशावर, नाशिककरही कुडकुडले!
उत्तर महाराष्ट्राकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे नाशिकचा पारा घसरला आहे. ओझरला चक्क 5.1 तापमानाची नोंद झाली.
नाशिकः उत्तर महाराष्ट्रामध्ये अक्षरशः थंटीची लाट आली असून, नंदुबारमधल्या अक्कलकुवा येथे तापमान चक्क 3 अंशावर गेले. सातपुडा पर्वत रांगातल्या अनेक गावांमध्ये भांड्यातल्या पाण्याचा बर्फ झालेला पाहायला मिळाला. मध्यरात्रीनंतर दवबिंदू गोठल्याने त्याचा ठिकठिकाणी बर्फ झाला. दुसरीकडे नाशिकमध्येही बोचरा गारठा वाढला आहे. येणारे काही दिवसही थंडीचे राहतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
थंडीची लाट कशामुळे?
सध्या अफगाणिस्तानातून सतत पश्चिम चक्रावाताचे आगमन होत आहे. अरबी समुद्राकडून बाष्पाचा पुरवठा होत आहे. त्यामुळे उत्तर भारतात बर्फवृष्टी होतेय. दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, राजस्थानाकडून थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातही थंडीची लाट आल्याचे दिसत आहे. यामुळे गहू, हरभरा, द्राक्ष आणि काढणीला आलेल्या लाल कांद्याचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. साधारणतः आणखी दहा दिवस हा कडाका राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील इतर शहरांच्या तापमानात 1 ते 3 अंशांपर्यंत कुठे वाढ तर कुठे घसरण दिसून आली. यवतमाळचे कमाल तापमान 7 अंशांनी घसरले. त्यानंतर चंद्रपूर 6 अंश म्हणजेच दुसऱ्या क्रमांकावर असून मुंबई, कुलाबा, गोंदिया, नागपूर, वर्ध्याच्या तापमानात 5 अंशांची घसरण दिसून आली.
नाशिक गारेगार
उत्तर महाराष्ट्राकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे नाशिकचा पारा घसरला आहे. सोमवारी ओझरला चक्क 5.1 तापमानाची नोंद झाली. निफाडला 6.1, मालेगाव 10.2 वर होते. मात्र, आज पहाटेपासून ढगाळ वातावरण तयार झाल्याने वाऱ्यामधील गारवा थोडासा कमी झालाय. शिवाय निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात 10 अंश सेल्सिअसवर गेल्याने थंडीपासून अंशतः दिलासा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या गारठून टाकणाऱ्या थंडीतून ऊब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहे, तर कोणी फिरणाचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहे.
पावसाचीही शक्यता
औरंगाबाद शहराचे तापमान सोमवारी एकाच दिवसात 5 अंशांनी घसरले. सोमवारी हे तापमान 11 अंशांवर पोहोचले. थंडीचा कडाकाही वाढला. महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊसही झाला. थंड वारे, बाष्प, उष्ण हवा, आर्द्रता आणि कमी दाबामुळे विदर्भ, मराठवाड्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. येत्या 14 जानेवारीपर्यंत विदर्भ, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी शेतातील पिकांची तसेच फळबागांची आणि नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
इतर बातम्याः
नाशिक महापालिका निवडणुकीत सन्मानपूर्वक आघाडी, भुजबळांचे संकेत, शिवसेना अन् काँग्रेस राजी होणार का?