महिला डॉक्टर सात वर्षांपासून कोमात, स्ट्रेचरवरुन साईंच्या दर्शनाला
मनोज गाडेकर, टीव्ही 9 मराठी, शिर्डी : साईबाबांच्या शिर्डीत साईसमाधी मंदिरात हृदय हेलावून टाकणारा प्रसंग सर्वांना अनुभवयाला मिळाला. गेल्या सात वर्षांपासून कोमात असलेल्या आणि पेशाने डॉक्टर असलेल्या 37 वर्षीय महिलेला कुटुंबातील सदस्यांनी थेट स्ट्रेचरवर साईंच्या दरबारी आणलं. साईबाबांनीच तिला आता बरं करण्याचं साकडं शीतल या महिलेच्या कुटुंबीयांनी घातलंय. स्ट्रेचरवर थेट साईबाबांच्या दर्शनासाठी येण्याचा हा संस्थानच्या […]
मनोज गाडेकर, टीव्ही 9 मराठी, शिर्डी : साईबाबांच्या शिर्डीत साईसमाधी मंदिरात हृदय हेलावून टाकणारा प्रसंग सर्वांना अनुभवयाला मिळाला. गेल्या सात वर्षांपासून कोमात असलेल्या आणि पेशाने डॉक्टर असलेल्या 37 वर्षीय महिलेला कुटुंबातील सदस्यांनी थेट स्ट्रेचरवर साईंच्या दरबारी आणलं. साईबाबांनीच तिला आता बरं करण्याचं साकडं शीतल या महिलेच्या कुटुंबीयांनी घातलंय. स्ट्रेचरवर थेट साईबाबांच्या दर्शनासाठी येण्याचा हा संस्थानच्या इतिहासातील कदाचित पहिलाच प्रसंग अलावा.
अनेक साई भक्तांनी साईंच्या दरबारात आजार बरे झाल्याचं सांगितलंय. या पार्श्वभूमीवर आता वर्धा शहरातून आलेल्या मुंगल कुटुंबीयांनी अनेक ठिकाणी उपचार केल्यावर साईं बाबांवर श्रद्धा ठेवत शीतलसाठी प्राथर्ना केली.
वर्धा शहरात राहणारे बाबाराव मुंगल यांना दोन मुली आहेत. ते एसटी महामंडळात अकाऊंटट क्लार्क म्हणून सेवानिवृत्त झालेत. दोन मुलींपैकी शीतल मोठी मुलगी आहे. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत शीतलने बालरोगतज्ञ म्हणून एमडीपर्यंत शिक्षण घेतलं आणि मुंबईतील कोकीळाबेन रुग्णालयात बालरोग विभागात आयसीयू इनचार्ज म्हणून रुजू झाली.
डॉक्टर म्हणून नोकरी सुरु झाल्यानंतर शीतलने लग्न केलं. सर्व काही सुरळीत आणि आनंदात सुरु होतं. याच दरम्यान सात वर्षांपूर्वी हॉस्पिटलमध्ये पायरी उतरत असताना पाय घसरल्याने शीतल पडली आणि कोमात गेली. गेल्या सात वर्षांपासून देशभरातील अनेक हॉस्पिटलमध्ये आई-वडिलांनी तिला उपचारासाठी नेलं, मात्र अद्याप यश मिळू शकलं नाही.
मुंगल कुटुंबीयांना अखेर तिला आपल्या वर्धा येथील निवासस्थानी ठेवण्याचा निर्णय घेतला. बाबाराव यांचे मित्र आणि साई सेवक म्हणून काम केलेले मुंबई येथील भाटिया यांनी कुटुंबीयांना साई दरबारी येण्याची विनंती केली. त्यानुसार मुंगल कुटुंबीय थेट वर्ध्याहून रुग्णवाहिका घेऊन साई दरबारी पोहोचले.
कोमात असणाऱ्या शीतलला स्ट्रेचरवरून आज साई मंदिरात आणण्यात आलं. या ठिकाणी साई समाधीसमोर शीतलला नेलं आणि साईबाबांना साकडं घातलं. शीतलच्या आई आणि वडिलांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ज्यावेळी विज्ञान संपते त्यावेळी अध्यात्म सुरु होते अशी भावना जनमानसात आहे. अनेकदा वैद्यकीय उपचार संपल्यावर ईश्वराकडे धाव घेतली जाते. याच उक्तीप्रमाणे आज मुंगल कुटुंबीयांनी साईंच्या दरबारी हजेरी लावत साईंना साकडं घातलंय. साईंच्या आशीर्वादाने कोमात असलेली शीतल पुन्हा एकदा बरी होईल अशी अपेक्षा तिच्या कुटुंबीयांना आहे.