कराडः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी जोरदार टीका केलीय. नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून केलेले भाषण म्हणजे थाळी, टाळी वाजवा, दिवे लावा या प्रकारातलं होते, असा घणाघात पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय. (congress leader Prithviraj Chavan criticism on narendra modi speech)
भाषणात कोरोनाविरोधातील लढाई कशी लढणार हे स्पष्ट केलं नाही. लसीची कमतरता का आहे हे जनतेला न सांगता लसीकरणाच्या उत्सव साजरा करा असे सांगतात. कामगारांना काम सोडून जाऊ नका, लस द्या असं सांगतात. मात्र पोटापाण्याचं काय, याबाबत काही बोलले नाहीत, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत. कोरोनाच्या संकटात मोदींच्या भाषणातून देशातील जनतेला कसलाही दिलासा मिळाला नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यातील आणि देशातील आरोग्य यंत्रणा कोलमडली असून, लसीचा तुटवडा जाणवत असल्याने अशा परिस्थितीत कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लॉकडाऊनचे समर्थन केले.
परदेशातून लसी आयात करण्याच्या पर्यायावर शंका असून, ते देश आपल्याला लस का देतील, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. आपल्या देशातील लोकांना ती लस चालेल का हे तपासण्यासाठी अनेक महिने जातील, त्यापेक्षा आपल्या देशात तयार होणाऱ्या लसीला लागणारा कच्चा माल अमेरिकेसारख्या देशांनी द्यावा, यासाठी तेथील भारतीय नागरिकांनी त्या सरकारवर दबाव वाढवणे गरजेचे असल्याचे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
देवेंद्र फडणवीस यांनी औषध कंपनीवर दबाव टाकून खासगी इंजेक्शनचा साठा विकत घेतला. देवेंद्र फडणवीस यांच्या नातेवाईकांनी आरोग्य यंत्रणेवर दबाव आणून नियमबाह्य लस टोचून घेतली असून, या सर्वांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीय.
संबंधित बातम्या
रेमडिसिव्हरसाठी भाजपला पत्र देणारे FDA आयुक्त अभिमन्यू काळेंची बदली, आव्हाड म्हणतात, मुजोर अधिकारी
congress leader Prithviraj Chavan criticism on narendra modi speech