शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पीक विमा भरण्यासाठी 5 दिवसांची मुदतवाढ
खरीप हंगाम 2019 चा पीक विमा भरण्यासाठी आणखी 5 दिवस वाढवून मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारच्या कृषी विभागाने अध्यादेश काढत 29 जुलै 2019 पर्यंत पीक विमा भरण्यास मुदतवाढ दिली आहे.
उस्मानाबाद : खरीप हंगाम 2019 चा पीक विमा भरण्यासाठी आणखी 5 दिवस वाढवून मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारच्या कृषी विभागाने अध्यादेश काढत 29 जुलै 2019 पर्यंत पीक विमा भरण्यास मुदतवाढ दिली आहे.
कृषी विभागाने सुरुवातीला 24 जुलै ही पीक विमा भरण्याची शेवटची तारीख निश्चित केली होती. मात्र, तलाठ्यांचा सही आणि शिक्का असलेला सातबारा मिळवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. शिवाय पीक विमा भरताना विमा कंपनीचे सर्व्हर आणि इंटरनेट अनेकवेळा बंद असल्याने पीक विमा भरण्याच अनेक अडचणी येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. ही मागणी अखेर मान्य होत मुदतवाढ मिळाली. ही मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सुरुवातीला कृषी विभागाने खरीप हंगाम पीक विम्यासाठी 24 जुलैपर्यंतचीच मुदत दिली होती. आता मुदतवाढ मिळाल्याने शेतकऱ्यांना 29 जुलैपर्यंत पीक विमा करता येणार आहे. मुदतवाढीची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी विमा कंपन्यांनी आवश्यक ती प्रसिद्धी आणि प्रचार मोहीम राबवावी, अशाही सूचना कृषी विभागाने संबंधित विमा कंपन्यांना दिल्या आहेत.