मी आंदोलनाच्या तयारीत, विधानसभेत एकनाथ खडसे कडाडले
सुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : सरकारला दुष्काळाचं गांभीर्य नाही, असं म्हणत माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सरकारला धारेवर धरलंय. वीज बिल भरलं जात नसल्यामुळे वीज कापली जात आहे. पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन कापू नये, असं म्हणत आपण आंदोलनाच्या तयारीत असल्याचा इशाराही खडसेंनी दिला. सर्वांना भेटल्यानंतरही माझ्या मतदारसंघात पाणी मिळत नाही, […]
सुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : सरकारला दुष्काळाचं गांभीर्य नाही, असं म्हणत माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सरकारला धारेवर धरलंय. वीज बिल भरलं जात नसल्यामुळे वीज कापली जात आहे. पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन कापू नये, असं म्हणत आपण आंदोलनाच्या तयारीत असल्याचा इशाराही खडसेंनी दिला. सर्वांना भेटल्यानंतरही माझ्या मतदारसंघात पाणी मिळत नाही, अशी हतबलता खडसेंनी बोलून दाखवली.
दुष्काळाची तीव्रता भीषण आहे. आगामी काळात चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. चाऱ्याला जिल्हाबंदी करण्यात यावी. अन्य ठिकाणचा निधी मनरेगासाठी वापरला गेला पाहिजे, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली.
प्रशासकीय स्तरावर अनेक पदं रिक्त आहेत. मग दुष्काळाचा सामना करणार कसा? अनेक ठिकाणी तलाठी, ग्रामसेवक, बीडीओ यांच्या जागा रिक्त आहेत. दुष्काळाचा पोरखेळ चालवलाय का तुम्ही? वीज मंडळाचे अधिकारी कलेक्टरचंही ऐकत नाहीत, असं म्हणत एकनाथ खडसे विधानसभेत कडाडले.
दुष्काळ असो किंवा शेतकऱ्यांसाठी वीज कनेक्शन, एकनाथ खडसेंनी सरकारला धारेवर धरण्याची एकही संधी सोडलेली नाही. गेल्या काही अधिवेशनांमध्येही याच पद्धतीने एकनाथ खडसेंनी सरकारला धारेवर धरत अनेक प्रश्न विचारले होते. भाजपचं सरकार आलं तेव्हा खडसेंकडे कृषी आणि महसूल खातं होतं.
एवढंच नाही, तर भाजपविरोधातील धुसफुसही खडसेंच्या तोंडून अनेकदा बाहेर पडली आहे. काँग्रेसने जाहीरपणे खडसेंना ऑफर दिल्यामुळे ते कधी चर्चेत आले, तर स्वतःच्याच सरकारविरोधात जाहीरपणे बोलल्यामुळेही ते चर्चेत आले. पण मतदारसंघातील आणि राज्यातील प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वतःच्या सरकारवरच बोलण्यासाठी खडसेंनी कधीही मागे पाहिलं नाही. पुन्हा एकदा त्याचीच झलक विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळाली.