महापारेषणच्या मनोऱ्यांवरुन जाणार ऑप्टिकल फायबर, बिझनेस मॉडेल तयार करण्याच्या ऊर्जामंत्र्यांच्या सूचना
महापारेषणच्या मनोऱ्यांवरुन ऑप्टिकल फायबर जाणार आहे. तसेच त्याचा व्यवसायिक वापर करण्याचे बिझनेस मॉडेल तयार करा, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.
मुंबई : महापारेषण कंपनीने उत्पन्नाचे अभिनव स्रोत शोधण्यासह यंत्रणेतील सुधारणेसाठी आधुनिकीकरण आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. पारेषणच्या ट्रान्समिशन लाईनवरुन ऑप्टिकल फायबर केबल टाकून त्याद्वारे अंतर्गत संदेशवहन व्यवस्था प्रभावी करण्यासह उत्पन्नवाढीसाठी त्याचा व्यवसायिक वापर करण्याचे बिझनेस मॉडेल तयार करा, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. (Energy Minister Nitin Raut On Mahapareshan Meeting)
त्यामुळे ट्रान्समिशनमध्ये अमूलाग्र सुधारणा होऊन राज्यातील वीज वितरणाच्या समस्या दूर होण्यास मदत होईल. तसेच दळणवळण क्षेत्रासाठी ही व्यवस्था मोठी फायदेशीर ठरुन ग्राहकांना जलद इंटरनेट सेवेचा फायदा मिळू शकेल, असं उर्जामंत्री म्हणाले.
महापारेषणच्या पारेषण शुल्काच्या अनुषंगाने उर्जामंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज एमएसईबी होल्डींग कंपनी सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीला महापारेषण आणि महावितरणचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
राज्यात महापारेषणचे 45 हजार कि. मी. लांबीचे वाहिन्यांचे जाळे असून या वाहिन्यांवरुन वीजेच्या तारेखाली ऑप्टिकल फायबर केबल टाकून सर्व सबस्टेशन जोडता येतील. त्याचा फायदा पारेषणच्या संदेशवहन यंत्रणेत गतीमानता आणि आधुनिकता येऊन देखभाल दुरुस्ती तसेच कोठे बिघाड असल्यास तात्काळ त्यावर काम करणे सोपे होईल. मुंबईत 12 ऑक्टोबर रोजी झालेल्या वीजपुरवठा खंडित प्रकरणामुळे तर याची गरज लक्षात आली असून त्यावर तात्काळ काम सुरु करावे, अशा सूचना उर्जामंत्र्यांनी दिल्या.
नितीन राऊत म्हणाले, “ऑप्टिकल फायबरद्वारे आंतरजाल सेवा पुरवठादार, ब्रॉडबॅन्ड कंपन्यांना जलद इंटरनेट पुरविणे शक्य होणार असून महापारेषणचे राज्यभर असलेले जाळे यासाठी फायदेशीर ठरणार आहे. यामधील व्यावसायिक उत्पन्नाची संधी शोधण्याच्यादृष्टीने एक उत्कृष्ट ‘बिझनेस मॉडेल’ तयार करा. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागारांची सेवा घ्यावी”
ट्रान्समिशनचे राज्यात 86 हजार मनोरे (टॉवर्स) असून त्यावर मोबाईल सेवेसाठी अँटेना उभारणे शक्य आहे. तसा प्रयोगही दोन ठिकाणी करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यावर मंत्री राऊत यांनी बिझनेस मॉडेलमध्ये त्याचा समावेश करा, अशा सचूना दिल्या.
महापारेषणची सबस्टेशन, ट्रान्समिशन लाईन आदी यंत्रणेच्या आधुनिकीकरणाची गरज मुंबईच्या वीजखंडित घटनेमुळे तीव्रतेने समोर आली आहे. त्यामुळे नजीकचे नियोजन आणि मध्यावधी आणि दीर्घकालिन नियोजनात सांगड घालून आधुनिकीकरणाच्या उपाययोजना तात्काळ हाती घ्याव्या लागतील. करावयाचे काम आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आणि सध्याच्या सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानानुसार झाले पाहिजे, यावर राऊत यांनी भर दिला.
राज्यात ट्रान्सफॉर्मस नादुरुस्त होण्याचे, त्याचे ऑईल खराब होणे या समस्यांवर तात्काळ उपाययोजना कराव्यात. त्यासाठी वीजेची मागणी आणि पुरवठा याचे योग्य नियोजन होण्यासाठी जिल्हा पातळीवरच त्याचा आराखडा तयार केला पाहिजे. सर्वच क्षेत्रासाठी सुरळीत वीजपुरवठा होण्यास भविष्यातील मागणीचा अंदाज (डिमांड फोरकास्टिंग) करण्याची व्यवस्था जिल्हा पातळीवरच झाले पाहिजे. तसा प्रस्ताव तातडीने करावा, असेही डॉ. राऊत म्हणाले.
(Energy Minister Nitin Raut On Mahapareshan Meeting)
संबंधित बातम्या
“मुंबईत वीज पुरवठ्याची जबाबदारी तुमची, चुका मान्य करा”, ऊर्जामंत्री नितीन राऊत अधिकाऱ्यांवर भडकले
मुंबईतील वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता- नितीन राऊत