हरितालिका विसर्जनावेळी माय-लेकरांसह चारजण वाहून गेले
हरितालिका विसर्जनावेळी हिंगणघाट येथील वणा नदी पाय घसरल्याने आई, मुलगी, मुलगा आणि शेजारिण वाहून गेल्या. तिघे अद्यापही बेपत्ता. बेपत्ता तिघांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आलं आहे.
वर्धा : हिंगणघाट येथील वणा नदीच्या प्रवाहात दोन महिला आणि दोन मुले असे चारजण वाहून गेले ( Four drowns in river ). वणा नदीच्या कवडघाट नदीघाटावर सोमवारा (2 सप्टेंबर)हरितालिका विसर्जनासाठी महिलांची गर्दी होती. यावेळी गौरी विसर्जन करताना पाय घसरुन दोन महिला आणि दोन मुले वाहून गेली. या घटनेदरम्यान तिथे उपस्थित पोलीस रामदास चाकोले यांनी एका महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र, डॉक्टरांनी त्या महिलेला मृत घोषित केले. तर इतर तीन मृतदेह अद्याप सापडलेले नाही. दु:खद म्हणजे वाहून गेलेल्या चारजणांमध्ये आई आणि दोन मुलांचा समावेश आहे.
हिंगणघाटच्या शास्त्री वार्डातील काही महिला घरी हरितालिका पूजन करून वणा नदीकाठावर गौरी विसर्जनासाठी गेल्या होत्या. यावेळी रिया रणजीत भगत (वय 35)आणि त्यांचा 10 वर्षीय मुलगा अभि आणि 13 वर्षीय अंजना सोबत होते. विसर्जनादरम्यान अभिचा पाय घसरला आणि तो नदीच्या प्रवाहात वाहू लागला. त्याला वाचवण्यासाठी त्याची बहीण अंजना हिने पाण्यात उडी घेतली. मात्र, अंजनाही पाण्याच्या प्रवाहासोबत वाहू लागली. आपल्या दोन्ही मुलांना पाण्यात बुडताना पाहून त्यांची आई रिया यांनीही पाण्यात उडी घेतली. मात्र, रिया त्यांच्या दोन मुलांसोबत पाण्यासोबत वाहू लागल्या. या तिघांना वाहताना पाहून शेजारच्या दिपाली भटेने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु त्या सुद्धा पाण्यात बुडाल्या. त्यानंतर महिलांनी आरडाओरडा सुरू केला.
या घटनेची तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. राष्ट्रीय महामार्गावरील वणा नदी पुलाजवळ एक महिला वाहून जात असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता पोलीस रामदास चाकोले यांनी नदीत उडी घेतली आणि रिया भगतला बाहेर काढलं. त्यावेळी रिया यांचा श्वास सुरु होता. त्यामुळे पोलिसांनी जागेवर प्राथमिक उपचार करुन त्यांच्या पोटातील पाणी काढले आणि उपचारासाठी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या दुर्घटनेची माहिती मिळताच यावेळी समीर कुणावार यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, बेपत्ता तिघांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या टीमलाही पाचारण करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या :
17 वर्षीय तरुणीवर चाकू हल्ला, नागरिकांनी आरोपीला जागेवरच चोपलं
मनमाड-मुंबई गोदावरी एक्स्प्रेसमध्ये बाप्पा विराजमान
जालन्यातील बलात्कार पीडितेवर औरंगाबादेत घाईघाईत अंत्यसंस्कार, भावाचा आरोप
फोटो लावा किंवा संपत्ती जप्त करा, पण नांदेडच्या उपजिल्हाधिकाऱ्याला बेड्या ठोका, सीआयडीला आदेश