चौकशी केली, काही केलं तरी काय उपयोग, गोपीनाथ मुंडेंच्या बहिणीची हतबल प्रतिक्रिया
बीड : लंडनमध्ये पत्रकार परिषद घेऊन कथित हॅकरने खळबळजनक दावे केले. यामध्ये सर्वात खळबळजनक दावा म्हणजे केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू हा अपघाताने नव्हे, तर घाताने झाला होता, असाही दावा करण्यात आला. यामुळे काहींनी चौकशीची मागणी केली आहे, तर काहींकडून राजकारण केलं जात असल्याचा आरोप होतोय. टीव्ही 9 मराठीने याप्रकरणी गोपीनाथ मुंडे यांच्या बहिणी […]
बीड : लंडनमध्ये पत्रकार परिषद घेऊन कथित हॅकरने खळबळजनक दावे केले. यामध्ये सर्वात खळबळजनक दावा म्हणजे केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू हा अपघाताने नव्हे, तर घाताने झाला होता, असाही दावा करण्यात आला. यामुळे काहींनी चौकशीची मागणी केली आहे, तर काहींकडून राजकारण केलं जात असल्याचा आरोप होतोय. टीव्ही 9 मराठीने याप्रकरणी गोपीनाथ मुंडे यांच्या बहिणी नर्मदा कराड आणि सरस्वती कराड यांच्याशी बातचीत केली. या दोघींनीही अत्यंत हतबल प्रतिक्रिया दिली.
“आम्हाला याचं अवघड वाटतं. हे कसं झालं याबाबत आम्हाला वाईट वाटतं. मारलं असलं आणि काहीही झालं तरी आता काय करावं. आता काही उपयोग नाही. निवडणुकीच्या काळातही साहेब दिसायला लागलेत. साहेब मोठे होते. त्यामुळे ते दिसणारच,” अशी प्रतिक्रिया सरस्वती कराड यांनी दिली.
“त्यांचा (गोपीनाथ मुंडे) घात केलाय की काय आपल्याला कसं कळणार. भाऊ दिल्लीला होता. आपलं कोण होतं तिथं सांगणारं.. माझा वाघ होता.. फक्त वाघ होता.. माय म्हणायची दिल्लीला जाऊ नको, दिल्ली चांगली नाही म्हणायची… आईने दिल्ली पाहिली होती.. आई म्हणायची राजकारण सोडून दे, ते म्हणायचे आई मी राजकारण सोडलं तर मग राहिलं काय.. एवढा संघर्ष करुन काय उपयोग.., असंही दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या बहिणीने सांगितलं.
गोपीनाथ मुंडे यांच्या बहीण नर्मदा कराडही बोलताना भावूक झाल्या. साहेबांचं एकच वाक्य होतं. मी जन्मलोय लोकांसाठी.. नात्यामध्ये घुसलेले नव्हते ते. कुटुंबामध्येही लक्ष नसायचं, फक्त लोकांसाठी त्यांनी आयुष्य वेचलं होतं, अशी भावूक प्रतिक्रिया नर्मदा कराड यांनी दिली.
काय आहे हॅकरचा दावा?
इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएम हॅक होऊ शकतं की नाही, याबाबत अमेरिकन सायबर एक्स्पर्टने मोठा दावा केला आहे. अमेरिकन सायबर एक्स्पर्ट सईद शूजा असं या एक्स्पर्टचं नाव आहे, त्याने लंडनमध्ये दावा केला आहे की, 2014 च्या निवडणुकीत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅकिंग माहित होतं, त्यामुळेच त्यांची हत्या झाली. लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक केलं होतं. 14 लोकांच्या टीमने हे काम केलं होतं. त्यापैकी काहींची हत्या झाल्याचाही दावा अमेरिकेच्या एक्स्पर्टने लंडनमध्ये केला आहे. तर दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या सांगण्यावरुन हॅक केलं असल्याचाही दावा करण्यात आला.
पाहा व्हिडीओ