मंगळवेढ्यातलं हुरडा पार्टी डेस्टिनेशन दुष्काळामुळे ओस पडलं!
मंगळवेढा : हिवाळ्यात खवय्यांना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याच्या चविष्ट गुळभेंडी हुरडा आणि रानमेव्याची ओढ लागते. वर्षभर या हुरड्यासाठी बेत आखले जातात. त्यासाठी कुटुंब आणि मित्रांसोबत खवय्ये पर्यटक मंगळवेढ्यात हजेरी लावत असतात. यंदा मात्र या सर्वच खवय्यांची निराशा झाली आहे. कारण दुष्काळामुळे यंदा शेतातले पीक जळून गेल्याने हुरडा पार्ट्यांअभावी शिवारे ओस पडली आहेत. लांबवर पसरलेल्या काळ्याभोर पिकवू […]
मंगळवेढा : हिवाळ्यात खवय्यांना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याच्या चविष्ट गुळभेंडी हुरडा आणि रानमेव्याची ओढ लागते. वर्षभर या हुरड्यासाठी बेत आखले जातात. त्यासाठी कुटुंब आणि मित्रांसोबत खवय्ये पर्यटक मंगळवेढ्यात हजेरी लावत असतात. यंदा मात्र या सर्वच खवय्यांची निराशा झाली आहे. कारण दुष्काळामुळे यंदा शेतातले पीक जळून गेल्याने हुरडा पार्ट्यांअभावी शिवारे ओस पडली आहेत.
लांबवर पसरलेल्या काळ्याभोर पिकवू जमिनी, उपयुक्त हवामान आणि केवळ 2-3 पावसावर येणारी पांढऱ्याशुभ्र नैसर्गिक ज्वारीचे अफाट पीक यामुळे येथील मालदांडी ज्वारीला जगभरातून मोठी मागणी असते. यामुळेच येथील मालदांडी ज्वारीला केंद्र सरकारने जीआय मानांकन दिले.
मंगळवेढ्याच्या शिवारातील ही ज्वारी देशविदेशातील बाजारात चढ्या दराने विकली जाऊ लागली. या ज्वारीच्या कोवळ्या गोड कणसातून येणारा हुरडा हा देखील तेवढाच प्रसिद्ध. मात्र यंदा पावसाने दगा दिल्याने बहुतांश ठिकाणी पेरण्याचं झाल्या नाहीत. ज्या ठिकाणी झाल्या तेथे पीक गुडघाभर उगवले आणि पुन्हा पाऊस न झाल्याने जळून गेले, त्यामुळे ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारी उगवली नाही.
मंगळवेढ्याच्या हुरड्यासमोर सर्व पक्वान बेचव
डिसेंबर महिना सुरु होताच खरेतर मंगळवेढा तालुक्यातील गावोगावी या हुरडा पार्ट्यांना सुरुवात होते. मंगळवेढ्यातील या स्पेशल हुरडा पार्ट्यांची खासियत न्यारी असते ती या ठिकाणी असलेल्या मालदांडी, कुचकुची, दूध मोगरा, सुरती अशा विविध प्रकारच्या हुरड्यांसाठी. कोवळ्या ज्वारीची कणसे आरावर भाजल्यानंतर हा हुरडा तयार होतो. त्यासोबत भाजलेले शेंगदाणे, गुळ, काळी चटणी, रानमेवा इत्यादी पदार्थ खाल्ले जातात. मंगळवेढ्याच्या या सुप्रसिद्ध हुरड्यासमोर कुठलेही पक्वान बेचव ठरतात.
चविष्ट आणि आरेग्यासाठी लाभदायक
ज्वारीचे पीक राज्यभरातील अनेक भागात घेतले जाते असले तरी मंगळवेढ्याच्या या ज्वारीची बातच निराळी आहे. या ज्वारीची चव आणि रंग हे इतर ज्वारीपेक्षा वेगळे असते. ही ज्वारी शरीरासाठीही अत्यंत गुणकारी असते. त्यामुळे याभागात ज्वारी खाणाऱ्याला दवाखान्याची पायरी चढावी लागत नाही. यामुळेच मंगळवेढा परिसरात एकही आयसीयू नाही हे विशेष.
यंदाच्या दुष्काळामुळे मंगळवेढ्यातील शेतकरी उध्वस्त झाला आहे. शेतात जळलेलं पीक, उत्पन्नाची सोय नाही, अगदी जनावरांना खायला द्यायलाही पीक उगवले नाही. त्यामुळे ‘आता आम्हालाच बाहेरून येणारी हायब्रीड ज्वारी खायची वेळ येणार’, अशी खंत येथील शेतकरी व्यक्त करत आहेत. ज्या दामाजीपंतांनी दुष्काळात बादशहाची ज्वारी कोठारे मोकळी केली, त्याच मंगळवेढ्याची ही कोठारे यंदा मोकळी पडल्याचे भीषण चित्र आहे.
मंगळवेढ्याच्या ज्वारीला देशविदेशातून मागणी
मंगळवेढ्यात व्यापाऱ्यांनी जुनी मालदांडी ज्वारी चढ्या दरात खरेदी करायला सुरुवात केली आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता अशा मोठमोठ्या शहरातून या मालदांडी ज्वारीला फार मोठी मागणी आहे. सध्या ही ज्वारी साडेचार हजार रुपयाच्या दराने विकली जात असली, तरी महिनाभरात हे दर सात हजार रुपयांपर्यंत जातील असा शेतकऱ्याचा अंदाज आहे. संपूर्ण देशविदेशाला चविष्ठ पांढरीशुभ्र भाकरी देणारा मंगळवेढ्याचा शेतकरी यंदा मात्र सरकारच्या मदतीवर अवलंबून आहे.