ST Strike| संपाचे वारे कायम; नाशिक, इगतपुरी, लासलगावमधले कर्मचारीही विलीनीकरणावर ठाम!
राज्य सरकार आता आक्रमक झाले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी उद्या सकाळपर्यंत कामावर रुजू व्हावे. अन्यथा कठोर कारवाई करू, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.
नाशिकः एकीकडे राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ केली. आंदोलकांमधील नेतृत्व करणारे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आझाद मैदानातून काढता पाय घेतला. मात्र, तरीही दुसरीकडे आंदोलक विलीनीकरणाच्या मुद्दयावर ठाम आहे. मुंबईत अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) आणि आंदोलनाचे नेतृत्व हाती घेतले आहे. परिणामी नाशिक जिल्ह्यातील नाशिक, इगतपुरी, लासलगावमध्ये कर्मचारी अजूनही विलीनीकरणार ठाम आहेत. त्यांनी आपले आंदोलन मागे घेतलेले नाही.
एकही बस निघाली नाही..
नाशिक जिल्ह्यात जवळपास सर्व एसटी डेपो अजूनही बंद आहेत. पगारवाढ नको, विलीनीकरण हवे, ही या कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. त्यामुळे त्यांनी गुरुवारी एकही बस डेपोबाहेर काढली नाही. परिणामी सर्वसामान्यांचे प्रचंड हाल सुरू आहेत. नाशिकच्या पंचवटी डेपोमध्येही हे आंदोलन तीव्रपणे सुरू आहे. आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना उद्या सकाळपर्यंत कामावर हजर रहावे, अन्यथा कारवाई करू, असा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर कर्मचारी काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल.
प्रवासभाडे वाढले…
लासलगावमध्येही तिच परिस्थिती आहे. कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर एसटीचे विलीनीकरण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, या आंदोलनामुळे चाकरमानी आणि सामन्यांचे प्रचंड हाल सुरू आहेत. खासगी वाहनांनी त्यांचे प्रवास भाडे दुप्पट केले आहे. त्यामुळे लोकांची अक्षरशः लूट सुरू आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
बसस्थानकात शुकशुकाट
इगतपुरी बसस्थानकात गुरुवारीही शुकशुकाट पाहायला मिळाला. राज्य सरकारने आंदोलकांची पगारवाढ केली. परिवहन मंत्र्यांनी त्यांना कामावर येण्याचे आवाहन केले. मात्र, त्यानंतरही आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे इगतपुरी बस डेपोमधील कर्मचारी अजूनही कामावर रुजू झाले नाहीत. परिणाम आज गुरुवारी एकही बस धावली नाही. त्याचा सामान्यांना फटका सहन करावा लागला.
कारवाईचा इशारा
दरम्यान, दुसरीकडे राज्य सरकार आता आक्रमक झाले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी उद्या सकाळपर्यंत कामावर रुजू व्हावे. अन्यथा कठोर कारवाई करू. निलंबित कर्मचारी उद्या सकाळी कामावर रुजू झाले, तर त्यांचे निलंबन मागे घेण्यात येईल. अन्यथा खैर नाही, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.
इतर बातम्याः