Toilet Scam: किरीट सोमय्यांच्या पत्नीची तक्रार; संजय राऊतांविरोधात आणखी एक खटला चालणार
भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी संजय राऊतांविरोधात मानहानीचा आरोप करत थेट कोर्टात खटला दाखल केला आहे. यावर आज सुनावणी झाली तेव्हा संजय राऊत यांनी मानहानीचा आरोप अमान्य असल्याचे शिवडी न्यायालयाला सांगितले.
मुंबई : पत्रा चाळ घोटाळा(Patra Chaal scam) प्रकरणी ईडीच्या ताब्यात असलेल्या संजय राऊतांविरोधात(Sanjay Raut) आणखी एक खटला चालणार आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमय्या(Medha Somayya) यांनी कथित शौचालय घोटाळा प्रकरणी संजय राऊतांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. यावर आज सुनावणी झाली. यावेळी राऊत यांनी मेधा सोमय्या यांनी केलेला मानहानीचा आरोप अमान्य असल्याचे कोर्टाला सांगीतले. कोर्टाने सुनावणीसाठी नवीन तारीख दिली आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी संजय राऊतांविरोधात मानहानीचा आरोप करत थेट कोर्टात खटला दाखल केला आहे. यावर आज सुनावणी झाली तेव्हा संजय राऊत यांनी मानहानीचा आरोप अमान्य असल्याचे शिवडी न्यायालयाला सांगितले.
राऊत यांच्यावर याप्रकरणी आता खटला चालविला जाणार आहे. ईडीच्या अटकेत असल्याने राऊत यांना व्हिडिओ कॉन्फर्नसिंगच्या माध्यमातून सुनावणीसाठी हजर करण्याचे आदेश महानगरदंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांनी आर्थर रॉड कारागृहाला दिले होते. त्यानंतर राऊत यांना व्हिडिओ कॉन्फर्नसिंगच्या माध्यमातून शिवडी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना त्यांच्याविरोधातील गुन्हा मान्य आहे का ? अशी विचारणा केली. त्यावर राऊत यांनी आपल्याला गुन्हा मान्य नसल्याचे सांगितले. आता 19 सप्टेंबर रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.
काय शौचालय घोटाळा
संजय राऊत यांनी शंभर कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप सोमय्या यांच्यावर केला होता. त्यावरून मेधा यांनी राऊत यांच्याविरोधात शिवडी कोर्टात मानहानीचा दावा केला. राऊत हे मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना जबाब नोंदवण्यासाठी हजर करण्याचे आदेश ईडीला द्यावेत, अशी मागणी मेधा सोमय्या यांनी न्यायालयाकडे केली होती. मीरा भाईंदर महापालिका आणि राज्यात हा काही कोटींचा टॉयलेट घोटाळा केला असल्याचा दावा राऊतांनी केला. सोमय्या हे युवा प्रतिष्ठान नावाची प्रतिष्ठान चालवत होते. त्यांनी खोटी बिलं देऊन पैसे उकळले. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याची कारणं दाखवून हा घोटाळा केला. एकूण 100 कोटींचा हा घोटाळा युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीमती सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबाने केलेला हा घोटाळा केल्याचा दावा राऊतांनी केला होता.