‘तुम्हाला जबरदस्ती नाही, पण जनता कर्फ्यू पाळा’, लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची नागरिकांना साद
नागरिकांनी खबरदारी म्हणून आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी स्वत:हून जनता कर्फ्यू पाळावा, अशी विनंती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी फेसबुकद्वारे केली आहे (Latur District collector appeal people to follow Janta Curfew).
लातूर : राज्यात कोरोनाने प्रचंड थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांची संख्या दररोज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तुटावी यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये, महापालिका हद्दीत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, लातूर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आहे. तरीही नागरिकांनी खबरदारी म्हणून आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी स्वत:हून जनता कर्फ्यू पाळावा, अशी विनंती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी फेसबुकद्वारे केली आहे. विशेष म्हणजे या जनता कर्फ्यू दरम्यान कोणालाही जबरदस्ती करण्यात येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे (Latur District collector appeal people to follow Janta Curfew).
जिल्हाधिकारी नेमकं काय म्हणाले?
“लातूर जिल्ह्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नियंत्रणात आहे. असे असले तरी लातूर जिल्ह्यातल्या नागरिकांनी येत्या शनिवारी आणि रविवारी स्वतः होऊन जनता कर्फ्यू पाळावा. अत्याआवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नका. जिल्हा प्रशासनाकडून जनता कर्फ्यू पाळा, अशी कसलीही सक्ती असणार नाही किंवा पोलीस देखील सक्ती करणार नाहीत. मात्र लोकांनी स्वतः हून जनता कर्फ्यू पाळावा आणि प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी यांचा उत्साह वाढवावा”, अशी विनंती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी केले फेसबुकवरून केली आहे.
लोक किती प्रतिसाद देतील?
बाजारपेठेतील दुकाने, वाहतूक चालू ठेवायची कि नाही, घरातून बाहेर पडायचे कि नाही, याचा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा आहे, असं स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला लोक किती प्रतिसाद देतात हे पहावे लागणार आहे (Latur District collector appeal people to follow Janta Curfew).
लातूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या किती?
लातूरमध्ये कोरानाची परिस्थिती सध्या तरी नियंत्रणात आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत लातूरमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. मात्र, तरीदेखील लातूरमधील आतापर्यंत 25 हजार 439 रुग्णांना कोरोनाची लागण झालीय. यापैकी 24 हजार 198 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. तर तब्बल 709 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. लातूरमध्ये सध्या एकूण 532 रुग्णांवर उपचार सुरु आहे.
हेही वाचा : विळखा वाढला! मुंबई, पुणे, नागपूर, कोरोनाचा स्फोट, राज्यात दिवसभरात 8 हजार 702 नवे बाधित