Maharashtra Corona | तुमच्या शहरात काय घडतं आहे कोरोनावर? लॉकडाऊनकडे सरकतं आहे का? वाचा मेट्रोतला स्पेशल रिपोर्ट
वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शहरातील कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra Corona Updates)
मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा स्फोट होत आहे. महाराष्ट्रात काल (15 मार्च) दिवसभरात 15 हजार रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नवी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लावण्यात आले आहेत. (Maharashtra Corona Updates District wise update)
महाराष्ट्रात15 हजार 51 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात एकूण 15 हजार 51 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 1 लाख 30 हजार 547 इतकी झाली आहे. तर 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 10 हजार 671 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून काही निर्बंध लावण्यात आले आहेत. यानुसार लग्न सोहळ्यात फक्त 50 लोकांना परवानगी असेल. तर सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी कायम आहे. सर्व सिनेमागृह, हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्क्यांच्या क्षमतेनं खुली असतील, त्यासाठी राज्य सरकारनं मुभा दिलीय. पण त्यांना कोरोनाची प्रतिबंधात्मक नियम पाळावे लागणार आहेत. मास्क नसल्यास ग्राहकांना हॉटेलमध्ये प्रवेश मिळणार नाही. तसेच तापमान यंत्राने तपासणी केली असता तापमान प्रमाणापेक्षा जास्त आढळल्यास त्यालाही प्रवेश मिळणार नाही.
मुंबईची स्थिती काय?
राजधानी मुंबईत मागील 24 तासात (15 मार्च सायंकाळी 6 वाजेपर्यंत) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1,063 आहे. आजवर बरे झालेले एकूण रुग्ण 3 लाख 18 हजार 642 इतके आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर 92 टक्के आहे. मुंबईत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 14 हजार 582 इतकी आहे. सध्या येथे रुग्ण दुपटीचा दर 165 दिवस आहे.
औरंगाबाद कोरोना रुग्णांची स्थिती काय?
औरंगाबाद शहरात पुन्हा कोरोना विस्फोट पाहायला मिळत आहे. काल औरंगाबाद शहरामध्ये जवळपास 1128 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने वाढ झाली आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा 58829 वर पोहोचला आहे. सध्या रुग्णालयांमध्ये 5796 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 1344 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत जवळपास 51 हजार 689 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
औरंगाबादेतील नामांकित रुग्णालयांना नोटीसा
औरंगाबाद शहरातील कोरोना रुग्णांची संख्येत हजाराच्या पटीने झपाट्याने वाढत होतं आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. औरंगाबादेत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासन अॅक्शन मोडवर असल्याचे पाहायला मिळत आहे. खाजगी रुग्णालयांनी बेडची संख्या वाढवावी, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच और्ंगाबाद शहरातील नामांकित रुग्णालयांना नोटीसा बजावल्या आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे आता प्रशासनाने कठोरात कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता खाजगी रुग्णालयांनी बेडची संख्या तीन दिवसात वाढवावी,अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिला आहे. विशेष म्हणजे नामांकित सात रुग्णालयांना यापूर्वी आदेश देण्यात आले आहे. मात्र त्यांनी बेडची संख्या न वाढवल्याने रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली आहे.
नाशिक कोरोना हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता
नाशिक हे राज्यातील कोरोना हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिकमध्ये गेल्या 11 दिवसात 4500 कोरोना रुग्ण आढळले आहेत. नाशिकमध्ये कोरोनाचा प्रसार 80 टक्क्याने होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नाशिकमध्ये लॉकडाऊन लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिकमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नाशिकमध्ये रुग्ण ट्रेसिंगपासून गर्दी नियंत्रणापर्यंत सर्व ठिकाणी पालिकेकडून पथक तैनात करण्यात आली आहे. या पथकात एक सिस्टर, एक लॅब टेक्निशियन, दोन शिक्षक आणि 1 मदतनीस यांचा समावेश आहे.
नाशिकमध्ये जिल्हा परिषदेच्या 40 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
विशेष म्हणजे नाशिकमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या हातावर पुन्हा क्वारंटाईनचा शिक्का मारला जाणार आहे. महापालिका अधिकारी रुग्णाच्या घरी जाऊन त्याची तपासणी करणार आहेत. तसेच संपर्कात आलेल्या सर्व रुग्णांची माहिती घेतली जाणार आहे. त्या रुग्णावर योग्य उपचार सुरु आहेत की नाही, याचाही तपास होणार आहे. तसेच गरज भासल्यास रुग्णांना खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येणार आहे.
तर दुसरीकडे नाशिक जिल्हा परिषदेच्या 40 पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात 4 दिवसात 40 हून अधिक जणांना लागण झाली आहे. त्यामुळे लसीकरण केंद्र वाढवा, असे पत्र जिल्हा परिषद अध्यक्षांनी सीईओंना दिले आहेत.
नागपूर कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट
नागपूर जिल्ह्यात काल पुन्हा कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट झालाय. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 2297 नव्या कोरोना रुग्णांची भर पडलीय. आज तपासणी केलेल्या 8666 नमुन्यांपैकी 26.5 टक्के कोरोना चाचण्या पॅाझिटीव्ह आल्या. जिल्ह्यात मागील 24 तासांमध्ये 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं चित्र आहे.
नागपूर जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून दोन हजारांच्या वर रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शहरातील कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नागपुरात 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे.
नागपुरात पोलीस अॅक्शन मोडमध्ये
लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी पोलीस चांगलेच अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळाले. नागपूर पोलिसांनी ठिकठिकाणी कारवाई आणि नाकाबंदी केली आहे. लॉकडाऊन काळात विनाकारण बाहेर फिरणाऱ्या 4047 जणांवर कारवाई केली आहे. यात 1347 वाहनं ताब्यात घेण्यात आली आहे. तर 42 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण अनेक जण विनाकारण बाहेर पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी सोमवारीला मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार 69 नागरिकांविरुध्द कारवाई केली आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये 500 प्रमाणे 34 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी 35888 नागरिकांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.
अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ
अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ पाहायला मिळत आहे. अहमदनगरमध्ये गेल्या 24 तासात 559 नवे रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील हॉटेल चालकांनी क्षमतेच्या 50 टक्के ग्राहक संख्येचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा गर्दी टाळण्यासाठी सर्व प्रकारची हॉटेल बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. हॉटेल, रेस्टॉरंट्स, सिंगल स्क्रीन थीएटर्स 50 टक्के क्षमतेने चालणार आहे. तर राजकीय, सामाजिक धार्मिक कार्यक्रमांना मनाई करण्यात आली आहे. तसेच लग्नात 50 तर अंत्यविधीला 20 जणांच उपस्थित राहू शकतात.
पुण्यातील कोरोनाची स्थिती
काल (15 मार्च) दिवसभरात 678 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर पुण्यात काल 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी एकजण पुण्याबाहेरील आहे. पुण्यात सध्या 370 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण आकडेवारीचा विचार केला तर पुण्यात आतापर्यंत 2 लाख 19 हजार 285 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यातील 2 लाख 2 हजार 339 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 11 हजार 984 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 4 हजार 962 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. पुण्यात कोरोना संसर्ग वाढल्यानंतर पोलीस दलातील42 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 16 पोलीस कर्मचारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर 26 पोलीस कर्मचाऱ्यांवर वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने घरीच विलगीकरणात उपचार घेतले जात आहे. त्यामुळे पुणे शहर पोलीस दलात वर्षभरात 1 हजार 530 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.
पुण्यातील 6500 पोलिसांना कोरोना लस
णे पोलिसात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साडेसहा हजार पोलिसांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 84 पोलिसांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. यातील काही पोलिसांनी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर ते पुन्हा कोरोनाबाधित झाले आहेत. याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांचे मत विचारात घेतले जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. (Maharashtra Corona Updates District wise Lockdown Update)
संबंधित बातम्या :
पुण्यात कोरोना लसीचे 1 लाख डोस उपलब्ध, 6500 पोलिसांना पहिला डोस
कोरोनामुळे शाळा बंद पडली, आर्थिक संकट ओढावल्याने शिक्षक गांजा तस्करीच्या व्यवसायात