दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची पहिली मदत जाहीर
उस्मानाबाद : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने पहिली मदत जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 151 दुष्काळी तालुक्यांतील शेतकऱ्यांना 2 हजार 900 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत शेतकऱ्यांना दोन टप्प्यांमध्ये दिली जाणार आहे. दुष्काळात जाहीर झालेली ही आजवरची सर्वात मोठी मदत आहे. 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. मदतीचे पैसे […]
उस्मानाबाद : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने पहिली मदत जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 151 दुष्काळी तालुक्यांतील शेतकऱ्यांना 2 हजार 900 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत शेतकऱ्यांना दोन टप्प्यांमध्ये दिली जाणार आहे. दुष्काळात जाहीर झालेली ही आजवरची सर्वात मोठी मदत आहे.
33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. मदतीचे पैसे हे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून बँकेला यातून कुठल्याही प्रकारची वसूली करता येणार नाही. मात्र ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले असेल त्यांच्याच खात्यात ही मदत जमा होऊ शकेल. तर आदर्श आचारसंहिता घोषित झालेल्या 264 गावांना सध्या या मदतीचा लाभ मिळू शकणार नाही.
ज्या शेतकऱ्यांचे दुष्काळामुळे दोन हेक्टर क्षेत्रावरील 33 टक्क्यांच्यावर नुकसान झालेले असेल त्या शेतकऱ्यांना दोन टप्प्यांमध्ये 6 हजार 800 रुपयांचा मदत मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना 3 हजार 400 रुपये मिळणार आहेत, तर उर्वरीत मदत ही दुसऱ्या टप्प्यात दिली जाणार आहे.
बहुवार्षिक पिकांसाठी दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत 18 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात 9 हजार रुपये खात्यात जमा होतील. हंगामी पीक उत्पादक शेतकऱ्यांना कमीत कमी एक हजार तर फळबागांचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना कमीत कमी दोन हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जाहीर केलेली मदती 31 मार्च 2019 पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.