Electricity Supply : वीज पुरवठ्यात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर; दिवसाला सरासरी 23.93 तास वीजपुरवठा
राज्याला काही दिवसांपूर्वी कोळसा संकटाचा (coal crisis) सामना करावा लागला होता. राज्यात कोळसा संकट निर्माण झाल्यामुळे, त्याचा परिणाम हा वीज (Electricity) उत्पादनावर झाला होता. मात्र तरी देखील वीज पुरवठ्याच्या बाबतीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे.
मुंबई : राज्याला काही दिवसांपूर्वी कोळसा संकटाचा (coal crisis) सामना करावा लागला होता. राज्यात कोळसा संकट निर्माण झाल्यामुळे, त्याचा परिणाम हा वीज (Electricity) उत्पादनावर झाला होता. ग्रामीण भागात भारनियमन सुरू करण्यात आले होते. मात्र तरी देखील महाराष्ट्र (Maharashtra) हे वीज पुरवठ्याच्या बाबतीत देशात आघाडीवर आहे. गेल्या उन्हाळ्यात राज्यात महावितरणकडून शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात दररोज सरासरी 23.93 तास वीजपुरवठा करण्यात आला आहे. तर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर गुजरात असून, गुजरातमध्ये दररोज सरासरी 23. 76 तास इतका वीजपुरवठा करण्यात आला आहे. तर मध्य प्रदेशात वीजपुरवठ्याचे सरासरी प्रमाण 22.70 तास एवढे आहे. समोर आलेल्या आकडेवारीवरून महाराष्ट्र हे वीज वितरणात आघाडीवर असल्याचे दिसून येते.देशाच्या दैनंदिन विजेच्या मागणीत यंदा सुमारे अठरा टक्क्यांची वाढ झाल्याने, अनेक राज्यात विजेचा तुटवडा जाणवला मात्र राज्यात योग्य नियोजनाच्या आधारे महावितरणने त्यावर मात केल्याचे चित्र आहे.
विजेच्या मागणीत वाढ
गेले दोन वर्ष देशासह राज्यावर कोरोनाचे संकट होते. याकाळात उद्योगधंदे बंद असल्याने विजेची मागणी देखील घटली होती. मात्र आता कोरोनाचे सावट कमी झाले आहे. सर्व प्रकारचे निर्बंध हटवण्यात आल्याने उद्योगधंदे पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झाले आहेत. त्यामुळे विजेच्या मागणीत देखील मोठी वाढ झाली आहे. यंदा देशात विजेची मागणी सुमारे 18 टक्क्यांनी वाढली आहे. सध्या देशातील विजेची गरज ही 2 लाख 16 हजार मेगावॅटवर पोहोचली आहे. विजेच्या मागणीत अचानक वाढ झाल्याने यंदाच्या उन्हाळ्यात अनेक राज्यात विजेची टंचाई जाणवत होती. त्यामुळे ग्रामीण भागांसह काही ठिकाणी शहरी भागात देखील भारनियमन सुरू करण्यात आले होते.
कोळसा संकटावर मात
राज्यात काही दिवसांपूर्वी कोळशाचा तुटवडा जाणवत होता. याचा फटका हा विज निर्मितीला देखील बसला. विजेचे उत्पादन कमी झाल्याने राज्यातील काही भागांमध्ये भारनियमन सुरू करण्यात आले होते. ऐन उन्हाळ्यात भारनियमनाचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. मात्र यावर तोडगा काढत महावितरणने पुन्हा वीजपुरवठा सुरळीत केला.