देशात महाराष्ट्रातील तर राज्यात नागपुरातील नद्या सर्वाधिक प्रदूषित
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या पाणी गुणवत्ता अहवालात तापी नदी सर्वाधिक प्रदूषित असल्याचं समोर आलं आहे. तर राज्यातील सर्वाधिक प्रदूषित नद्या नागपूर जिल्ह्यात आढळल्या आहेत.
चंद्रपूर : राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणाच्या स्तराने धोकादायक पातळी ओलांडली आहे. तिथे श्वास घेणंही कठीण झालं आहे. तर इकडे महाराष्ट्रातही पाणी प्रदूषणाची धक्कादायक माहिती समोर आली आहे (Delhi Pollution). महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या पाणी गुणवत्ता अहवालात (Water Quality Status) तापी नदी सर्वाधिक प्रदूषित असल्याचं समोर आलं आहे (Maharashtra Pollution Control Board). तर राज्यातील सर्वाधिक प्रदूषित नद्या नागपूर जिल्ह्यात आढळल्या आहेत. या अहवालानुसार 2017 च्या तुलनेत प्रदूषण कमी झाल्याचं सांगण्यात आलं आहे (Maharashtra River Pollution).
प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्रातील 176 नद्या आणि इतर ठिकाणी समुद्र, धरणं कुपनलिका, विहिरी ईत्यादी मिळून 228 पाणी गुणवत्ता तपासणी केंद्रांच्या आणि 66 भूजल सर्वेक्षण केंद्राच्या माध्यमातून अभ्यास करून हा अहवाल जाहीर केला आहे. ह्या प्रदूषणाच्या आधारावर मंडळाने महाराष्ट्रातील पाणी प्रदूषण निर्देशांक (Water Quality Index) ठरवला आहे. या सर्वेक्षणात पाण्याचे 43 मापदंड तपासण्यात आले. परंतु निर्देशांक ठरविताना PH, DO, BOD, आणि T Ecoli form हेच मापदंड विचारात घेतले गेले.
या मापदंडानुसार, महाराष्ट्रातील तापी नदी सर्वाधिक प्रदूषित आढळली. सोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा, वैनगंगा, प्राणहिता या नद्या देखील कमी श्रेणीत का होईना मात्र प्रदूषित आढळल्या.
महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील बहुतेक नद्या आणि जलस्त्रोत प्रदूषित आढळले आहेत. सोबतच अहमदनगर, जळगाव, पुणे, अकोला, ठाणे, पालघर जिल्ह्यातील काही जलस्रोत प्रदूषित आढळले.
भुजलाच्या बाबतीत 11 मापदंड ठरविण्यात आले त्यात PH, TH, Calcium, Magnesium, Cloride, TDS, Fluride, Nitrate, आणि Sulphate चा समावेश आहे. ठाणे जिल्ह्यातील काही स्रोत अत्यंत प्रदूषित, पिण्यास अयोग्य श्रेणीत तर अमरावती, चंद्रपूर, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पुणे, रायगड येथील भूजल स्त्रोत प्रदुषित आढळले आहेत. 66 नमुन्यांपैकी 36 नमुने प्रदूषित आढळले. त्यात नागपूर जिल्ह्यात 12, तर 7 नमुने कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या 2019 च्या पाहणीनुसार, देशात महाराष्ट्रात सर्वाधिक नद्या प्रदूषित आहेत. 2018 मध्ये 53 नद्या प्रदूषित होत्या. तर 2019 वर्षात 45 नद्या प्रदूषित असल्याचं आढळंल.
या प्रदूषित नद्यांमध्ये गोदावरी, मुठा, मोरणा, वैनगंगा, भीमा, कालू, कुंड लिका, मुठा, इंद्रावती, कण्हान, मुठा, मुठा-मुळा, पावणा, पेढी, पूर्णा, वर्धा, दारणा, कोलार, कृष्णा, निरा, पांझरा, पाताळगंगा, पैनगंगा, रान गवली, तापी, वेल, अंबा, भातसा, बिंदुसार, चंद्रभागा, घोड, कोयना, मांझरा, पेल्हार, सावित्री, सूर्या, तानसा, उल्हास, वैतरणा, वेना,पंचगंगा, उरमोडी, वाशिष्ठी यांचा समावेश आहे.
2008 ते 2014 या काळात चंद्रपूर जिल्ह्यात, परिसरात वर्धा, वैनगंगा, प्राणहिता या नद्या वाईट आणि मध्यम ते चांगल्या श्रेणीत(50-63, 38-50)येत आहेत. परंतु गेल्या दोन वर्षात पाणी प्रदूषण कमी होत असल्याचा आश्चर्यकारक निष्कर्ष या अहवालातून निघाला आहे.
महाराष्ट्र विभागवार प्रदूषण
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 2018-19 ह्या वर्षात केलेल्या निरीक्षणात भूजल आणि नद्या प्रदूषणात नागपूर सर्वाधिक प्रदूषित आहे.
1) नागपूर येथे 14 नमुन्यातील 12 केंद्रातील नमुने प्रदूषित 2) कोल्हापूर केंद्रावर 15 पैकी 10 नमुने प्रदूषित 3) पुणे केंद्रावर 6 पैकी 3 नमुने प्रदूषित 4)ठाणे केंद्रावर 5 पैकी 3 नमुने प्रदूषित 5)रायगड केंद्रावर 3 पैकी 1 नमुना प्रदूषित 6) चंद्रपूर केंद्रावर 2 पैकी 2 नमुने प्रदूषित 7)नाशिक केंद्रावर 7 पैकी 1 नमुना प्रदूषित 8)अमरावती केंद्रावर 3 पैकी 1 नमुना प्रदूषित
देशाची राजधानी दिल्ली वायुप्रदूषणाच्या विळख्यात अडकली असताना महाराष्ट्र मात्र जलप्रदूषणात दुर्दैवी आघाडी घेत आहे. त्यामुळे यावर कठोर आणि तातडीच्या उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे.