Marriage, Divorce, and Social Media : सोशल मीडियामुळे वाट लागली! वैवाहिक आयुष्य बरबाद; 80% सुखी संसार मोबाईलमुळे उद्ध्वस्त
मागील सहा महिन्यांत भरोसा सेलकडे पती-पत्नीमध्ये वाद झाल्याच्या तब्बल 1305 तक्रारी आल्या होत्या. यापैकी 80 टक्के तक्रारींमध्ये मोबाईलमुळे वाद झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अहमदनगर पोलिसांच्या भरोसा सेलने दिलेल्या आकडेवारीवरून 80 टक्के सुखी संसारात विष कालविण्याचे काम मोबाईल करत असल्याचे समोर आले आहे.
अहमदनगर : सोशल मीडियामुळे वैवाहिक आयुष्याची वाट लागली आहे. याला कारण आहे ते व्हॉटस्अॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामसह. या सोशल मीडिया अॅपमुळे नवरा-बायकोमधील संवाद दुरावत चालला असून, अनेकांचे वैवाहिक आयुष्य मोबाईलमुळे उद्ध्वस्त होत आहे. 80% सुखी संसार मोबाईलमुळे उद्ध्वस्त झाले आहेत. भरोसा सेलकडे आलेल्या विविध तक्रारींमुळे याचा खुलासा झाला आहे. अनेक जोडप्यांमध्ये मोबाईलमुळे वाद होत आहेत.
मागील सहा महिन्यांत भरोसा सेलकडे पती-पत्नीमध्ये वाद झाल्याच्या तब्बल 1305 तक्रारी आल्या होत्या. यापैकी 80 टक्के तक्रारींमध्ये मोबाईलमुळे वाद झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अहमदनगर पोलिसांच्या भरोसा सेलने दिलेल्या आकडेवारीवरून 80 टक्के सुखी संसारात विष कालविण्याचे काम मोबाईल करत असल्याचे समोर आले आहे.
सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नवरा-बायकोच्या नात्यामधील वाद घटस्फोटापर्यंत पोहचतात
सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नवरा-बायकोच्या नात्यामधील वाद घटस्फोटापर्यंत पोहचल्याचे भरोसा सेलकडून सांगण्यात आले. नवरा-बायकोमधील बहुतांश वादाला मोबाईल हेच कारण बनले आहे. अनेक तक्रारींमध्ये सतत फोनवर बोलणे, सोशल मीडियावर जास्त वेळ घालविणे, या सर्व कारणांमुळे वाद होत आहेत. यापूर्वी हुंडा, घरगुती हिंसाचार, दारूडा पती, अनैतिक संबंध ही कारणे घटस्फोटासाठी दिली जात होती. हायटेक युगात आणि बहुतांश जोडपी उच्चशिक्षित असतानासुद्धा सोशल मीडियासारखे कारण घटस्फोटासाठी कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे.
995 प्रकरणांमध्ये समुपदेशन
भरोसा सेलकडे गत सहा महिन्यांत पती-पत्नींच्या तक्रारींचा ओघच सुरू आहे. चालू वर्षांत आतापर्यंत 1305 तक्रारी आल्या आहेत. त्यामध्ये 995 तक्रारी भरोसा सेलच्या समुपदेशन केंद्राने समुपदेशनाद्वारे सोडविल्या आहेत. तसेच, 330 प्रकरणांची चौकशी सुरू आहे.
154 प्रकरणांत गुन्हे दाखल
भरोसा सेलकडे पती-पत्नीमधील वादाची तक्रार आल्यानंतर समुपदेशाद्वारे तक्रार निकाली काढण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, काही प्रकरणात समुपदेशन करून सुद्धा मार्ग निघत नसल्याने, शेवटी गुन्हा दाखल होता. अशाच पती-पत्नीमधील 154 प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तक्रारींचे स्वरूप
- अनेक तास मोबाईलवर टाईम पास करणे\
- सोशल मीडियावर चॅटिंग करणे
- बोलण्यावरुन थेट अनैतिक संबंध असल्याचा संशय
- सासर व माहेरच्यांचा संसारात हस्तक्षेप
- माहेरच्या लोकांशी सतत फोनवर बोलणे
- किरकोळ कारणावरून मारहाण करणे
- जुन्या मित्र-मैत्रिणींसोबत मोबाईलवर बोलणे चॅटिंग करणे
असा होतो गुन्हा दाखल
एखाद्या स्त्रीच्या पतीने किंवा पतीच्या नातेवाईकाने तिला क्रूर वागणूक वा छळ केल्यास भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 498 अ नुसार गुन्हा दाखल होतो तर 3 वर्षांचा कारावास व दंड अशा शिक्षेचे प्रावधान कायद्यात आहे. हा गुन्हा दखलपात्र व अजामिनपात्र असल्याने पोलिसांकडून पुढील कारवाई केली जाते. मोबाईलवरून झालेल्या वादाच्या शेकडो तक्रारी दाखल आहेत. या तक्रारींवर संबंधितांना एकत्रितपणे बोलावून घेत, समुपदेशन करीत पुन्हा संसार जुळविण्यासाठी भरोसा सेलकडून प्रयत्न सुरू आहेत.