नव्या शिक्षणमंत्र्यांच्या पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमात पालकांचा गोंधळ
राज्याचे नवे शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या पुण्यातील पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमात गोंधळ झाल्याचा प्रकार घडला आहे. शेलार पालकांना वेळ न देताच कार्यक्रमातून निघून गेल्याने संतप्त पालकांनी गोंधळ घातल्याचे सांगण्यात येत आहे.
पुणे : राज्याचे नवे शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या पुण्यातील पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमात गोंधळ झाल्याचा प्रकार घडला आहे. आठवीपर्यंत मुलांना नापास न करण्याचा कायदा असतानाही पुण्यातील एका शाळेने मुलांना नापास केल्याच्या मुद्द्यावर शेलार यांना बोलण्याची मागणी पालकांनी केली. मात्र, शेलार पालकांना वेळ न देताच कार्यक्रमातून निघून गेल्याने संतप्त पालकांनी गोंधळ घातfल्याचे सांगण्यात येत आहे.
पालकांनी सांगितले, “संबंधित शाळेने आमच्या 6 वी आणि 7 वीच्या मुलांना नापास केले. या शाळा मनमानी करत आहेत. आम्ही यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो, मात्र शिक्षणमंत्र्यांनी वेळ देणेही टाळले.” यावेळी शेलार यांना अकरावी प्रवेशातील गोंधळाबाबतही विचारणा करण्यात आली, मात्र त्यांनी यावरही बोलणे टाळले.
याआधी तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी मध्यस्थी केली होती. मात्र, शाळेने विद्यार्थ्यांना पुन्हा काढून टाकले, असाही आरोप संबंधित पालकांनी केला आहे. आशिष शेलार पुण्यातील हेल्दी ग्लोब स्मार्ट व्हर्च्युअल एज्युकेशनच्यावतीने ‘पढेगा भारत’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, राज्यसभा खासदार राकेश सिन्हा, खासदार अमर साबळे, अविनाश धर्माधिकारी, मेधा कुलकर्णी आदी मान्यवरही उपस्थित होते.