थकीत FRP साठी आमदार बच्चू कडूंचा साखर आयुक्तालयावर ‘प्रहार’
पुण्याच्या शिवाजीनगर येथील साखर आयुक्त कार्यालयावर आज प्रहार शेतकरी संघटनेनं 'ताबा आंदोलन' केला.
पुणे : पुण्याच्या शिवाजीनगर येथील साखर आयुक्त कार्यालयावर आज प्रहार शेतकरी संघटनेनं ‘ताबा आंदोलन’ केला. राज्यातील अनेक शेतकऱ्याचे उसाचे थकीत एफआरपी रक्कम त्वरित देण्यात यावी, अशी मागणी करत आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून ताबा आंदोलन करण्याक आले. आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी साखर संकुल इमारतीमध्ये घुसून घोषणाबाजी केली.
“सरकारमध्ये आणि विरोधकांमध्ये साखर सम्राट बसले आहेत. गेल्या तीन चार महिन्यापासून शेतकऱ्यांचे फोन येत आहेत. कारखानदार दोन्ही पार्टीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा कुणी वाली नाही. शेतकऱ्यांचे व्याजासहित पैसे देण्यात यावे. ते नाही झालं तर कारखानदारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे.” अशी भूमिका प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांची आहे.
साखर आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर बाहेर आलेल्या आमदार बच्चू कडू यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचीत केली. ते म्हणाले, “थकीत एफआरपी देण्याची अंतिम तारीख उद्या आयुक्त सांगणार आहेत. शेतकऱ्यांचे पैसे देण्याची आमची मागणी आहे. शेतकऱ्यांचे पैसे द्या, नाहीतर कारखानदारांची संपत्ती जप्त करा. सहकारमंत्र्यांच्याच कारखान्याचा एफआरपी थकीत आहे.”
यावेळी आमदार बच्चू कडू यांनी वजनकाट्याचा मुद्दाही उपस्थित केला. “अनेक कारखान्यांमध्ये काटेमारी होते. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. त्यामुळे पर्यायी काटा सरकारने उपलब्ध करु दिला आहे.” असे बच्चू कडू म्हणाले.
काय आहे FRP चा मुद्दा?
- उसाची थकित FRP 1500 कोटी रुपये
- गेल्या हंगामापूर्वीची रक्कम मात्र थकित
- प्रहार संघटनेचे आंदोलन थकित FRP साठी
- 73 कारखान्यांना साखर आयुक्तांच्या नोटिसा
- FRP न देणाऱ्या कारखान्यांची 1,436 कोटींची मालमत्ता जप्त
- ऊस गेल्यानंतर 14 दिवसांत FRP द्यावा असा नियम
यंदाची स्थिती काय?
- 2018-19 च्या हंगामात 94% FRP वाटप
- 2018-19 – 23,000 कोटींपैकी 21,604 कोटी FRP वाटप
- 20 लाख शेतकऱ्यांना FRP वाटप