Monsoon News : मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस, वीजांच्या कडकडाटासह वरुण राजा बरसला
या पावसाने मुंबईतील उपनगरीय लोकल वाहतूकही मंदावली आहे. तिन्ही मार्गावरील लोकल गाड्या जवळपास 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. हवामान खात्याने आणखी दोन दिवस मुंबई शहर आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवून येलो अलर्ट जारी केला आहे.
मुंबई : प्रचंड उकाड्यानंतर गुरुवार पाठोपाठ आजही मान्सून पूर्व पावसाने मुंबई शहर (Mumbai City) आणि उपनगरा (Suburban)त जोरदार हजेरी लावली आहे. आज सायंकाळी 8 वाजल्यानंतर वीजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पावसा (Rain)ने जोर धरला आहे. शहरातील दादर, प्रभादेवीस कुलाबा, वांद्रेसह पूर्व आणि पश्चिम उपगनगरात पावसाने दमदार संततधार सुरु ठेवली आहे. या पावसाने मुंबईतील उपनगरीय लोकल वाहतूकही मंदावली आहे. तिन्ही मार्गावरील लोकल गाड्या जवळपास 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. हवामान खात्याने आणखी दोन दिवस मुंबई शहर आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवून येलो अलर्ट जारी केला आहे.
पुढील 2-3 दिवसात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून व्यापेल
सुरवातीला कर्नाटकाच्या कारवारमध्ये आणि नंतर गोव्याच्या वेशीवर रेंगाळलेला मान्सून अखेर आज कोकणात दाखल झाला. सिंधुदुर्गात सर्च तालुक्यांत मान्सूनने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मान्सूनच्या पुढील प्रवासाबाबतही हवामान खाते आशावादी असून पुढील 2-3 दिवसात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून व्यापेल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. येत्या 3-4 तासांत मुंबई आणि रायगड जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.
Thunderstorm accompanied with lightning,light to moderate spells of rain & gusty winds very likely to occur at isolated places in the districts of Mumbai and Raigad during next 3-4hrs pic.twitter.com/2IlLBl0tcY
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 10, 2022
दक्षिण रायगडात मान्सूनपूर्व सरी
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार 13 जून रोजी पाऊस कोकणात धडकेल असे भाकीत केले होते. मात्र दक्षिण रायगडात आज संध्याकाळच्या सुमारास मान्सून पूर्व सरी बरसल्या. महाड, माणगाव परिसरात, पोलादपूर तालुक्यातील काही भागात, श्रीवर्धन, म्हसळा या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह मान्सून पूर्व सरी बरसल्या. या पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिक सुखावले तर हवालदिल झालेला बळीराजा देखील या पावसामुळे सुखावला आहे.