Ambedkar Jayanti 2022 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला कंत्राटदारांमुळे विलंब, मार्च 2024 पर्यंत काम पुर्ण होणार
मुंबईतील इंदू मिल ( Indu Mill) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या (Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar Memorial) कामाला मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या सुरू असलेले स्मारकाचे काम मार्च 2024 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती एमएमआरडीए प्रशासनाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली (RTI activist Anil Galgali) यांना दिली आहे.
मुंबई – मुंबईतील इंदू मिल ( Indu Mill) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या (Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar Memorial) कामाला मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या सुरू असलेले स्मारकाचे काम मार्च 2024 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती एमएमआरडीए प्रशासनाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली (RTI activist Anil Galgali) यांना दिली आहे. आतापर्यंत 209 कोटी रुपये कंत्राटदाराला देण्यात आले आहेत. आत्तापर्यंत स्मारकामधील 49 टक्के इमारती आणि सहा टक्के फूटपाथचे काम पूर्ण झाले आहे.आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे मुंबईतील आंबेडकर स्मारकाबाबत विविध माहिती मागवली होती.
आत्तापर्यंत 1089.95 कोटी रुपये मंजूर
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारकाचा अपेक्षित खर्च 763.05 कोटी रुपये आहे. सुधारित संकल्पनेनुसार 1089.95 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती एमएमआरडीए प्रशासनाने अनिल गलगली यांना दिली आहे. आजपर्यंत, 23 नोव्हेंबर 2021 पर्यंत एकूण 209.53 कोटी रुपये या प्रकल्पासाठी देण्यात आले आहेत. ज्यामध्ये 31.65 कोटी रुपयांचे मोबिलायझेशन अॅडव्हान्स आणि रुपये प्रकल्प सल्लागार शुल्क समाविष्ट आहे. तर 12.68 कोटी कंत्राटदार मेसर्स शापूरजी पालोनजी आणि प्रकल्प सल्लागार मेसर्स शशी प्रभू असोसिएट्स आणि डिझाइन असोसिएट्स यांना देण्यात आले आहेत.
36 महिन्यांत काम पूर्ण होणे अपेक्षित होते
संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 9 फेब्रुवारी 2018 रोजी कार्यादेश जारी करण्यात आला असून 36 महिन्यांत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. हा प्रकल्प १४ महिन्यांपूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु कंत्राटदारांनी त्यास विलंब केला अशी माहिती अनिल गलगली यांनी दिली आहे. एमएमआरडीएने आता विस्तारित कालावधीत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक आहे. यासंदर्भात गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि एमएमआरडीए आयुक्तांना पत्रे पाठवली आहेत.