Coroanvirus: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; रुग्णदुपटीचा कालावधी 653 दिवसांवर
मुंबईत रविवारी 700 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 19 रुग्णांचा मृत्यू झाला. शनिवारी 30 हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या असून मुंबईतील बाधितांचे प्रमाण 2.32 टक्के आहे.
मुंबई: काही दिवसांपूर्वी राज्यातील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस वेगाने सुधारत आहे. कोरोना (Coronavirus) रुग्णवाढीचा आलेख झपाट्याने खाली आल्याने मुंबईतील कोरोना रुग्णदुपटीचा कालावधी (डबलिंग रेट) 653 दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. तर सध्या दैनंदिन रुग्णसंख्या 700 च्या आसपास असून पॉझिटिव्हिटी रेट 0.10 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. (Coronavirus situation in Mumbai)
मुंबईत रविवारी 700 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 19 रुग्णांचा मृत्यू झाला. शनिवारी 30 हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या असून मुंबईतील बाधितांचे प्रमाण 2.32 टक्के आहे. रुग्णवाढीचा दर 0.10 टक्यांपर्यंत खाली आला आहे.
रविवारी 700 नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या 7 लाख 16 हजारांपुढे गेली आहे. एका दिवसात 704 रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत 6 लाख 83 हजारांहून अधिक म्हणजेच 95 टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या चांगलीच घटली आहे. सध्या 15 हजार 773 उपचाराधीन रुग्ण आहेत.
राज्यात करोना रुग्ण संख्येत घट
गेल्या 24 तासांमध्ये राज्यात कोरोनाच्या 10442 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 7504 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 56,39,271 रुग्ण बरे होऊ घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.44 टक्के इतके झाले आहे.
अजित पवार आणि राजेश टोपे कोल्हापूरच्या दौऱ्यावर
सध्या कोल्हापूर हा राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे कोल्हापूरचा दौरा करणार आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतील. दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी सोबत दोन्ही नेत्यांची बैठक होईल.कोल्हापुरात काल दिवसभरात 1586 नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. तर 30 जणांचा मृत्यू झाला होता.
संबंधित बातम्या:
Coronavirus: रत्नागिरीत आठ दिवसांचा लॉकडाऊन फेल; कोरोना पॉझिटिव्हिटी रेटमध्ये राज्यात दुसरा क्रमांक
वारीची परंपरा टिकली पाहिजे, पण कुंभमेळ्यात घडलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दक्षता: अजित पवार
(Coronavirus situation in Mumbai)