Jayant Patil : महाविकास आघाडीसंदर्भातल्या नाना पटोलेंच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीतर्फे जयंत पाटलांचंही प्रत्युत्तर, म्हणाले…
विधान परिषद विरोधीपक्ष नेतेपदावरून तीन पक्षांमध्ये वाद असल्याच्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, शिवसेनेने इतर दोन पक्षांना विचारून काही केले असते, तर ते अधिक योग्य ठरले असते. मात्र कोणतीच चर्चा आमच्यात झाली नाही.
मुंबई : भाजपाला विरोध आणि राज्यात जे शिंदे-फडणवीसांचे अवैध सरकार स्थापन झाले आहे, त्याला विरोध करण्यासाठी सर्वजण एकत्रिक काम करत आहेत. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) स्थापन झाली आहे. आता पटोले काय म्हणाले मला माहीत नाही, त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणे आवश्यक आहे, असे मला वाटत नाही नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली आहे. निर्णय घेत असताना विचारले जात नसेल, चर्चा केली जात नसेल तर विचार करावा लागेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले होते. त्यावर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीची भूमिका सांगितली. महाविकास आघाडीत राहण्याची सक्ती कुणालाही नाही. मात्र ती गरज असल्यामुळे आम्ही तिघे एकत्र आलो आहोत. ज्यांना ज्यांना भाजपाला विरोध करायचा आहे, त्यांना एकत्र आणण्यासाठी ही आघाडी स्थापन झाली आहे. त्यामुळे नाना पटोलेंच्या वक्तव्याला उत्तर देणार नसल्याचेच जयंत पाटील यांनी सांगितले आहे.
विरोधीपक्ष नेतेपदावरून वाद
विधान परिषद विरोधीपक्ष नेतेपदावरून तीन पक्षांमध्ये वाद असल्याच्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, शिवसेनेने इतर दोन पक्षांना विचारून काही केले असते, तर ते अधिक योग्य ठरले असते. मात्र कोणतीच चर्चा आमच्यात झाली नाही. राष्ट्रवादीने बाळासाहेब थोरातांशी चर्चा केली होती. जास्त संख्याबळ ज्यांच्याकडे आहे, त्याचा विरोधीपक्ष नेता होतो, अशी परंपरा आहे. विधान परिषदेत हा विरोधीपक्ष नेता निवडताना विचारले गेले नाही, असे अंबादास दानवे यांच्या निवडीच्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले. दरम्यान, शिवसेना अधिकृत पक्ष आहे. कामकाज सल्लागार समितीवर त्यांचा प्रतिनिधी असणे गरजेचे होते. त्यामुळे ते का टाळले लक्षात येत नाही. विरोधीपक्ष नेत्यांसह सर्वच जण विधानसभा अध्यक्षांना भेटले असल्याची माहिती त्यांनी दिली.
काय म्हणाले जयंत पाटील?
काय म्हणाले होते नाना पटोले?
विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष निवडीवरून नाना पटोले यांनी शिवसेना-राष्ट्रवादीवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. आमची आघाडी काही पर्मनंट आघाडी नाही. आमची आघाडी नैसर्गिक आघाडी नाही. विपरीत परिस्थितीत आम्ही आघाडी केली होती. आम्हाला विचारले जात नसेल तर आम्ही चर्चा करू, असे वक्तव्य त्यांनी केले होते. जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला होता. त्याप्रमाणे आम्ही विरोधात बसण्याची तयारी केली होती. 2019पासून राज्यात महाभारत सुरू आहे, त्याला सर्वस्वी भाजपा जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.