Jitendra Awhad : कुणाचं मन दुखावलं असेल तर मोठ्या मनानं माफ करा म्हणत शासकीय निवासस्थानातील कर्मचाऱ्यांचा आव्हाडांनी घेतला निरोप
या अडीच वर्षाच्या कार्यकाळात कुणाचे मन दुखावले गेले असेल तर मोठ्या मनाने माफ करा. या अडीच वर्षांमध्ये माझ्या शासकीय बंगल्यावर आलेला जेवण न-करता गेला असेल, असे मला वाटत नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
मुंबई : गृहनिर्माण मंत्री (Minister of Housing) म्हणून मला जे शासकीय निवासस्थान मिळाले होते, तेथे असणाऱ्या स्टाफसोबत एक भावनिक नाते तयार झाले होते. आता या सर्वांचा निरोप घेतला आहे. या सर्वांचे शतश: आभार, अशा भावना माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी व्यक्त केल्या आहेत. काल मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला. महाविकास आघाडीचे सरकारल कोसळले. त्यानंतर आता हे सर्व आमदार आपले शासकीय निवासस्थान सोडत आहेत. सर्वात आधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वर्षा निवासस्थान सोडले. त्यानंतर एक-एक मंत्री आपले निवासस्थान सोडत आहे. अशावेळी तेथील कर्मचाऱ्यांशी एक भावनिक नाते सर्वत नेत्यांचे झाले आहे. मागील अडीच वर्षांपासून तयार झालेले हे नाते असून त्यांचा आता निरोप घेण्यात आला, असे आव्हाड म्हणाले.
‘स्टाफची अनमोल मदत’
या ठिकाणावरून गृहनिर्माण विभागाचा राज्याचा कारभार हाकत असताना येथे असणाऱ्या सर्वच स्टाफची अनमोल मदत मला झाली. या सर्वांचा निरोप घेतला आहे. त्यांचे शतश: आभार, अशा आशयाचे ट्विटही त्यांनी केले आहे. ते म्हणाले, की हा अडीच वर्षाचा कार्यकाळ माझ्या दृष्टीने खूप चांगला होता. काल माझ्या या शासकीय बंगल्यामधील सर्व कर्मचारी आणि मंत्रालयातील सर्व कर्मचारी एकत्र आले. त्यांनी मला भावपूर्ण असा निरोप दिला.
गृहनिर्माणमंत्री म्हणून मला जे शासकीय निवासस्थान मिळाले होते,तेथे असणाऱ्या स्टाफ सोबत एक भावनिक नातं तयार झालं होत.या ठिकाणावरून गृहनिर्माण विभागाचा राज्याचा कारभार हाकत असताना येथे असणाऱ्या सर्वच स्टाफची अनमोल मदत मला झाली.या सर्वांचा काल निरोप घेतला त्यांचे शतश: आभार. pic.twitter.com/rgXTIWgFDa
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 1, 2022
‘माझे योगदान केवळ 1 टक्का’
या सर्व कर्मचाऱ्यांचे आणि माझे अत्यंत खेळीमेळीचे संबंध होते. माझ्याबरोबर त्यांचे अडीच वर्षातील वागणे यामध्ये कुठेही ते कर्मचारी आहेत आणि मी मंत्री आहे असे नव्हते, असे ते म्हणाले. माझे यश मोजले तर त्यामध्ये माझे स्वतःचे योगदान एक टक्के इतकेच आहे. बाकी या सर्व अधिकारी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सगळ्यांचे योगदान 99 टक्के आहे, असे आव्हाड म्हणाले.
‘जेवण न करता गेला असेल असे वाटत नाही’
या अडीच वर्षाच्या कार्यकाळात कुणाचे मन दुखावले गेले असेल तर मोठ्या मनाने माफ करा. या अडीच वर्षांमध्ये माझ्या शासकीय बंगल्यावर आलेला जेवण न-करता गेला असेल, असे मला वाटत नाही. ए 3 म्हणजे जवळ-जवळ अन्नपूर्णाच झाली होती. माझे आचारी तसेच जेवण वाढणाऱ्यांनीही कधी त्याबाबत तक्रार केली नाही. या सर्व कर्मचाऱ्यांना मन:पूर्वक शुभेच्छा, असे म्हणत आव्हाडांनी या कर्मचाऱ्यांचा निरोप घेतला.