12 आमदारांना विधानसभेत प्रवेश द्या, आशिष शेलारांचं विधानभवन सचिवांना पत्र
सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या 12 आमदारांचे सदस्यत्व रद्द केलं आहे. त्यामुळे भाजपमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी थेट विधानभवन सचिवांना पत्र लिहून सर्वच्या सर्व 12 आमदारांना विधानभवनात प्रवेश देण्याची विनंती केली आहे.
मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) भाजपच्या (bjp)12 आमदारांचे सदस्यत्व रद्द केलं आहे. त्यामुळे भाजपमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. भाजपचे नेते आशिष शेलार (ashish shelar)यांनी थेट विधानभवन सचिवांना पत्र लिहून सर्वच्या सर्व 12 आमदारांना विधानभवनात प्रवेश देण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्र विधानसभेने भाजपाच्या 12 आमदारांचे केलेले एक वर्षांचे निलंबन हे सर्वोच्च न्यायालयाने अवैध, घटनाबाह्य व अतार्किक ठरवून रद्द केले आहे. त्यामुळे आम्हाला विधानभवनात प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी आशिष शेलार यांनी विधानभवन सचिवांना पत्र लिहून केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार यापुढे सदर आमदारांना विधानभवनात प्रवेश खुला झाल्याकडे ही सचिवांचे त्यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे आता विधान भवन सचिव काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपाच्या 12 आमदारांना 1 वर्षांसाठी निलंबित केल्याच्या विरोधात 12 आमदारांतर्फे आमदार आशिष शेलार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 28 जानेवारीला या याचिकेवरील निकाल आला असून सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हे निलंबन अवैध ठरवून रद्द केले आहे. आज याबाबत 12 आमदारांच्यावतीने शेलार यांनी विधानसभा सचिवांना पत्र लिहून या याचिकेत न्यायालयाने दिलेल्या आदेशाची सविस्तर कायदेशीर माहिती सचिवांना अवगत केली असून सोबत निवाड्यांची प्रत ही जोडली आहे. न्यायालयाने निलंबन रद्द केल्यामुळे यापुढे विधिमंडळाच्या मुंबई आणि नागपूर येथील विधानभवन परिसरात प्रवेशाचा आमचा मार्ग मोकळा केला आहे, याकडे विधानसभा सचिवालयाचे लक्ष वेधले आहे.
कोर्ट काय म्हणालं?
सर्वोच्च न्यायालयाने 28 जानेवारी रोजी भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द ठरवलं होतं. यावेळी कोर्टाने टिप्पणी केली होती. असंवैधानिक, बेकायदेशीर अशा शब्दांवर कोर्टानं लक्ष वेधलं होतं. दरम्यान, यावेळी दोन वेळा जी सुनावणी झाली, त्यावेळी 12 आमदारांचं वर्तन चुकीचं नव्हतं, असा युक्तिवाद भाजपच्या आमदारांच्या वकिलांनी केला होता. आमदारांच्या आक्रमकतेला परिस्थिती जबाबदार होती, असं त्यांनी म्हटलं होतं. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्यानं भाजपच्या बारा आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये जुलै महिन्यात निलंबन करण्यात आलं होतं. स्वतः आशिष शेलार हे या निलंबनाच्या मागणीविरोधातील सुनावणीदरम्यान हजर झाले होते. एका वर्षसाठी निलंबन करण्यात आलं होतं.
निलंबित आमदार कोणते?
1 अतुल भातखळकर 2 राम सातपुते 3 आशिष शेलार 4 संजय कुटे 5 योगेश सागर 6 किर्तीकुमार बागडिया 7 गिरीश महाजन 8 जयकुमार रावल 9 अभिमन्यू पवार 10 पराग अळवणी 11 नारायण कुचे 12 हरीश पिंपळे
निलंबनाचं कारण काय?
राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्र सरकारकडून मिळावा म्हणून अधिवेशनात ठराव मांडला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका मांडली. त्यानंतर भुजबळांनी बोलण्यास सुरुवात केली. यावेळी उज्ज्वला गॅससाठी डेटा वापरला जातो. मग ओबीसींच्या आरक्षणासाठी का दिला जात नाही? असा सवाल भुजबळ यांनी केला होता. त्यावर फडणवीसांनी हरकतीचा मुद्दा मांडला होता. त्यावेळी तालिका अध्यक्षांनी फडणवीसांचा हरकतीचा मुद्दा स्वीकारला नाही. अध्यक्षांनी भुजबळांना बोलण्यास सांगितलं. त्यामुळे भाजपचे आमदार आक्रमक झाले होते. भाजपच्या आक्रमक आमदारांनी अध्यक्षांच्या समोरी हौदात येऊन जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यानंतर एका आमदाराने अध्यक्षांचा माईक ओढला. या गदारोळात धक्काबुक्की झाली. यावेळी भाजपच्या आमदारांनी तालिका अध्यक्षांना शिवीगाळही केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे सभागृहाचं वातावरण अधिकच तापलं होतं.
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रातील घडामोडींचा वेगवान आढावा TV9 मराठीवरhttps://t.co/dHdeMGPxGD#Maharashtra | #News | #Live | #Mumbai
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 31, 2022
संबंधित बातम्या:
RRR Movie : आरआरआरच्या रिलीजची फायनल तारीख ठरली, कोणत्या तारखेली रिलीज? वाचा एका क्लिकवर
शरद पवारांची कोरोनावर मात; डॉक्टर, मित्र, हितचिंतकांचे मानले आभार