Eknath Shinde : शिंदे जीवाभावाचे, बंडखोरांचं पर्यटन ते परत येतील; संजय राऊतांच्या प्रेस कॉन्फरन्समधले 5 मोठे मुद्दे
भाजपाचे (BJP) कारस्थान यामागे आहे. मात्र शिवसेना ते कधीही होऊ देणार नाही. हा शिवसेनेतला अंतर्गत प्रश्न आहे. गेलेले आमदार परत येतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आमचे जीवाभावाचे सहकारी आहेत. काही गैरसमज झाले असतील. मात्र ते परत येतील. बंडखोर आमदार हे पर्यटनाला गेले आहेत. आमदारांनी फिरायला हवे, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातल्या राजकारणात उलथापालथ झाली आहे. महाविकास आघाडीवर सत्ता जाण्याची टांगती तलवार आहे. दुपारनंतर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. या घडामोडींवर संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. भाजपाचे (BJP) कारस्थान यामागे आहे. मात्र शिवसेना ते कधीही होऊ देणार नाही. हा शिवसेनेतला अंतर्गत प्रश्न आहे. गेलेले आमदार परत येतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. संजय राऊत नेमके काय म्हटले, जाणून घेऊ पाच महत्त्वाचे मुद्दे…
- राज्यपालांना आधी बरे होऊ द्या – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोना झाला आहे. त्यामुळे त्यांना आधी बरे होऊ द्या. मग बघू कोणाकडे किती आमदार आहेत ते. उगाच कुणी उतावीळ होऊ नये.
- समज गैरसमज असतात, दूर होतील – आम्हाला खात्री आहे एकनाथ शिंदे आणि आमचे गेलेले सहकारी स्वगृही परत येतील. हा आमच्या घरातील प्रश्न आहे. त्यांचा आणि आमचा व्यवस्थित संवाद सुरू आहे. एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत. बाळासाहेब ठाकरेंपासून ते आत्तापर्यंत ते कायम शिवसेनेबरोबर राहिलेले आहेत. आज सकाळीच त्यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. जे बाहेर आहेत ते सर्व शिवसैनिक आहेत. त्यांना शिवसेनेबरोबरच राहायचे आहे. काही समज गैरसमज असतात. त्यातून या गोष्टी घडल्या असतील तर त्या दूर होतील.
- काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर नाराजी नाही, मागून वार नाही – काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आम्ही सत्तेत आहोत. आमच्यात सुसंवाद आहे. त्यामुळे कोणत्या आमदाराने असे म्हटले असेल आणि त्यांची काही नाराजी असेल असे वाटत नाही. शिवसेना पाठीमागून वार करत नाही. शिवसेनेला महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी एकनाथ शिंदेंचा वापर केला, यावर त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.
- भाजपाला टोमणा – जर कोणाला काही आनंदाचे भरते आले असेल, की शिवसेनेत काही तरी होत आहे, तर तसे काहीच नाही. यानिमित्ताने ठाकरे सरकार पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल, तर शिवसेनेमध्ये राखेतून जन्म घेण्याची ताकद आहे. शिवसेनेने आधाही राखेतून जन्म घेत पुन्हा गरूडझेप घेतली आहे. भाजपाबद्दल मला काहीही बोलायचे नाही. मी शिवसेनेविषयी बोलेल.
- त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठीही सोपे नाही – एकनाथ शिंदेंना पक्ष सोडणे सोपे नाही आणि आम्हालाही त्यांना सोडणे सोपे नाही. कोणतीही गोष्ट लपून राहिलेली नाही. ठाण्यातील कोणत्याही निवडणुका असतील तर त्याविषयी एकनाथ शिंदे यांना विचारूनच निर्णय घेतले जातात. दरम्यान, त्यांच्या कोणत्याही मागण्या नाहीत. ते शिवसेनेतच राहतील आणि शिवसेनेतच आयुष्यभर राहतील.
हे सुद्धा वाचा
Non Stop LIVE Update