Nashik| दक्षिणेत कलावंतांना देवासारखं मानतात, पण मराठी माणूस कमी पडतो; जयंत पाटलांची खंत
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, आज सर्वच क्षेत्रात सुविचार दुर्मिळ होत चालला आहे. अशा परिस्थितीत सुविचार मंचने आपल्याच माणसांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला आहे, ही गोष्ट प्रेरणादायी आहे.
नाशिकः दक्षिणेकडील राज्यात कलावंतांना देवाप्रमाणे मानतात. त्यांना मुख्यमंत्री (CM) करतात, परंतु मराठी (Marathi) माणूस मराठी माणसांना मोठं करण्यात कमी पडतो अशी खंत जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली. ते नाशिकमध्ये (Nashik) पार पडलेल्या सुविचार गौरव पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला पालकमंत्री छगन भुजबळ, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, सुविचार मंचचे अध्यक्ष अशोक खुटाडे, सचिव अॅड. रवींद्र पगार, संयोजक आकाश पगार उपस्थित होते. नाशिकमधील मानाचा पुरस्कार म्हणून सुविचार गौरवची ख्याती आहे. या पुरस्काराने अभिनेते सिध्दार्थ जाधव, पूजा सावंत, अभिनेते चिन्मय उदगीरकर यांच्यासह विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणारया मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
आपण प्रेमही राखून करतो…
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अभिनेते सिध्दार्थ जाधवच्या भाषणातला धागा पकडत म्हणाले, दिसण्यावर काहीच नसतं, तर माणसाचं असणं महत्वाचं आहे. व्यासपीठावरील मराठी कलाकारांचा गौरव करतांना त्यांनी सांगितले की, दक्षिणेकडे अभिनेत्यांना मुख्यमंत्री करतात, पण आपण आपल्या माणसांना मोठ करण्यात कमी पडतो. आपण प्रेम, द्वेष राखून करतो. मात्र, खरेपणाने यश नक्कीच मिळतं, असे सांगत त्यांनी पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले.
सुविचार मंचचे कौतुक
कार्यक्रमाचे अध्यक्ष छगन भुजबळ म्हणाले की, आज सर्वच क्षेत्रात सुविचार दुर्मिळ होत चालला आहे. अशा परिस्थितीत सुविचार मंचने आपल्याच माणसांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला आहे, ही गोष्ट प्रेरणादायी आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध मनोरंजनपर कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. रवींद्र पगार यांनी केले. सूत्रसंचालन संयोजक आकाश पगार यांनी केले. यावेळी आमदार हिरामण खोसकर, आमदार माणिकराव कोकाटे, माजी खासदार समीर भुजबळ, देविदास पिंगळे, डॉ. शोभा बच्छाव, अशोक खुटाडे, दीपिका चव्हाण आदी उपस्थित होते.
या मान्यवरांचा गौरव
सुविचार गौरव पुरस्काराने नितीन महाजन (प्रशासन), प्रा. शंकर कापडणीस ( साहित्य), ईश्वरी सावकार (क्रीडा), मधुकर कडलग (शिक्षण), किशोर खैरनार (कृषी), डॉ. अतुल वडगावकर ( वैद्यकीय), हेमंत राठी (उद्योग), चिन्मय उद्गीरकर (कला), पूजा सावंत (कला), सिद्धार्थ जाधव ( कला) या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
इतर बातम्याः
नाशिकचे संमेलन फक्त भुजबळांचे, पंचतारांकितच्या भपक्यात धोरणाचा बळी; ठाले-पाटलांचे ताशेरे
Nashik | घरांच्या किमती प्रति चौरस फूट 500 रुपयांनी महागणार; क्रेडाईचा निर्णय, कारण काय?