Nashik | काँग्रेस स्वबळावर लढणार की नाही; पटोलेंनी नाशिकमध्ये काय दिले संकेत?
पटोले म्हणाले की, जनतेचे मूळ मुद्दे बाजूला सारले जात आहेत. आपल्या देशाची ओळख बेरोजगारांचा देश झाली आहे. लोकांचे जगणं मुश्किल झाले आहे. केंद्रातील सरकार फेल झाले आहे. लोक भाजपला हसतात. रिझर्व्ह बँकेचा फंड गायब करून टाकला आहे.
नाशिकः इगतपुरी येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या (Congress) तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा आज रविवारी समारोप झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी यावेळी मार्गदर्शन केले. ही रणनीतीची बैठक होती. त्यामुळे ती माध्यमांसमोर सांगितली जात नाही. काँग्रेसपक्ष येणाऱ्या महापालिका निवडणुकीत चांगले काम करेल. मात्र, आम्ही स्वबळावर लढू की नाही, हे वारंवार सांगितले जाणार नाही. हा आमच्या रणनीतीचा भाग आहे, असे म्हणत त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले.
भाजप हा मुख्य शत्रू
संजय निरुपम यांनी काल शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. त्यावर नाना पटोले म्हणाले की, भाजप आणि शिवसेना यांची अनेक वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता राहिली आहे. भाजप हा आमचा मुख्य शत्रू आहे. त्यामुळे आमची त्याच पद्धतीची भूमिका आणि रणनीती राहणार आहे. आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्याबद्दल पटोले म्हणाले की, बाळासाहेब हे महाराष्ट्रातील मोठा विचार होते. तरुणांना विचार देणारे व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्राची ओळख होते. बाळासाहेबांना धोकेबाज लोक आवडत नसत. ज्यांनी धोका केला त्यांना ते जवळ करत नव्हते. त्यामुळे त्यांचेच विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे नेत आहेत, असे म्हणत त्यांनी भाजपला टोमणा हाणला.
वीज कापणे भाजपचे पाप
पटोले म्हणाले की, वीज कापणे हे भाजपचे पाप असून, ते आमच्या उरावर पडत आहे. भाजप लोकांना बिल भरू नका, असे सांगत आहे. मात्र, लोक भाजपच्या काळातील परिणाम भोगत आहेत. त्यामुळे चालू बिल भरणे आणि आपले कनेक्शन चालू ठेवणे हाच निर्णय झाला आहे, असा दावाही त्यांनी केला. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरही तोंडसुख घेतले. ते म्हणाले, केंद्रातील सरकार किती मोठ्या उद्योगपतींचं कर्ज माफ करत आहे. त्याचे आकडे त्यांनी जाहीर करावे. केंद्रातील सरकार किती भ्रष्टाचारी आहे ते बघा. दुसऱ्याच्या घरावर गोटे मारताना आपले घर किती काचाचे आहे ते पाहावेस असा टोलाही त्यांनी हाणला. शिवाय येणाऱ्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसचीच सत्ता येईल, असा दावा त्यांनी केला.
रिझर्व्ह बँक लुटली
पटोले म्हणाले की, जनतेचे मूळ मुद्दे बाजूला सारले जात आहेत. आपल्या देशाची ओळख बेरोजगारांचा देश झाली आहे. लोकांचे जगणं मुश्किल झाले आहे. केंद्रातील सरकार फेल झाले आहे. लोक भाजपला हसतात. रिझर्व्ह बँकेचा फंड गायब करून टाकला. देशाची रिझर्व्ह बँक लुटली. मोठी लूट होत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
इतर बातम्याः
Balasaheb Thackeray | उभ्या महाराष्ट्रावर गारूड करणारा बाळासाहेब नावाचा झंझावात…!