इगतपुरी तालुक्यात संततधार पाऊस; अवकाळी पावसाने रब्बी हंगामही हातचा गेला, बळीराजा चिंताग्रस्त!
इगतपुरी तालुक्यातील विविध भागात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला आहे. अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचे पहायला मिळत आहे.
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील विविध भागात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला आहे. अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचे पहायला मिळत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, बळीराजा हवालदिल झाला आहे. पावसामुळे खरीप हंगामासोबत रब्बी हंगाम देखील वाया गेला, मात्र अद्यापही महसूल प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करावेत व नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
इगतपुरी तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. ऊस, कापूस, गहू, हरभरा, धान अशा पिकांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे गव्हाचे पीक तर भुईसपाट झाल्याचे पहायला मिळत आहे. तालुक्यात सोमवारी रात्रभर पाऊस सुरू होता. रात्रभर सुरू असलेल्या पावसाने आज पहाटे विश्रांती घेतली. दरम्यान खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. निदान रब्बी हंगाम तरी साधला जाईल या आशेने शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा नव्या जोमाने पिकांची पेरणी केली. मात्र आता देखील अवकाळी पाऊस पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव
अवकाळी पावसासोबतच गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. या वातावरणाचा मोठा फटका हरभाऱ्या सारख्या पिकांना बसला आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव झाला असून, उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवण्या येत आहे.
संबंधित बातम्या
धक्कादायक: रस्त्यावरील खड्ड्यामुळे हादरे बसल्याने रायफलमधून सुटली गोळी, हिंगोलीत जवानाचा मृत्यू!
ST Strike| पवार-परबांची साडेचार तास बैठक; कोणताही ठोस निर्णय नाही, संपाचा तिढा कायम!