नाशिक रेल्वे स्थानकात ‘द बर्निंग ट्रेन’; उभी असलेली एक्सप्रेस पेटली, धुराचे लोट पसरले अन् प्रवाशांमध्ये…
या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठी वित्तहानी झाली आहे. संपूर्ण डबाच जळून खाक झाला आहे. आगीचं नेमकं कारणं समजू शकलं नाही.
नाशिक: नाशिकरोड रेल्वे (Nashik Road railway station) स्थानकात आज सकाळी सकाळी द बर्निंग ट्रेनचा थरार पाहायला मिळाला. रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या हावडा एक्सप्रेसच्या (Howrah Express) इंजिनने अचानक पेट (fire) घेतला. त्यामुळे अवघ्या काही मिनिटातच आगीचे लोळ पसरले आणि प्रचंड धूरच धूर झाला. त्यामुळे रेल्वेतील प्रवाशी प्रचंड घाबरले आणि त्यांनी हातातलं सामान टाकून जीव वाचवण्यासाठी रेल्वेतून पळ काढला. एक्सप्रेसला अचानक लागलेली आग आणि प्रवाशांची उडालेली धावपळ यामुळे रेल्वे स्थानकात एकच आफरातफरी निर्माण झाली होती. या आगीत कोणतीही जीवीत हानी झाली नाही. आगीवर नियमंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे.
मुंबईकडे येणारी हावडा एक्सप्रेस नाशिक रोड स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर उभी होती. यावेळी सकाळी 8.30 वाजता अचानक एक्सप्रेसच्या इंजिनला आग लागली. सकाळी सुटलेला गार वाऱ्यामुळे या आगीने भराभर पेट घेतला.
त्यामुळे प्रवाशी अधिकच घाबरले. आग वाढतच गेल्याने प्रवाशांनी पटापट जीवमुठीत घेऊन रेल्वेतून उड्या मारल्या. त्यामुळे अवघ्या काही मिनिटातच अख्खी एक्सप्रेस रिकामी झाली.
आग अत्यंत भीषण होती. आगीचे लोळ आणि धुराचे लोट संपूर्ण स्टेशन परिसरात पसरले होते. सगळीकडे धूरच धूर झाल्याने माणसंही एकमेकांना दिसत नव्हते. त्यामुळे आगीवर नियंत्रण आणण्यात अडथळे येत होते.
आगीची माहिती मिळताच सर्वात आधी रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, अधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी स्टेशनवर धाव घेऊन आग विझवण्याचं काम सुरू केलं. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाली. सर्वांनी आग विझवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, आगीवर अजूनही नियंत्रण मिळवण्यात आलं नसल्याचं सांगितलं जात आहे.
या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठी वित्तहानी झाली आहे. संपूर्ण डबाच जळून खाक झाला आहे. आगीचं नेमकं कारणं समजू शकलं नाही. इंजिन तापल्यानं ही आग लागली असावी असा कयास वर्तवला जात आहे.
मात्र, आगीचं नेमकं कारण समजण्यासाठी या घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
रेल्वे स्थानकात आग लागल्याने मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचं दिसत आहे.