कोरेगाव-भीमा हिंसाचार हा पूर्वनियोजित कट, नवाब मलिकांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप
कोरेगाव भीमा हिंसाचाराचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कडे आताच का दिला? असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई : कोरेगाव-भीमा हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता. अनुसूचित जमातीविरोधात वातावरण निर्मितीसाठी भाजपचा डाव होता, असा गंभीर आरोप अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी (Nawab Malik on Koregaon Bhima) केला आहे.
नवाब मलिक यांनी फडणवीस सरकार आणि केंद्र सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. कोरेगाव भीमा हिंसाचाराचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कडे आताच का दिला? राज्यात भाजप सरकार असताना का दिला नाही? असा सवालही मलिक यांनी उपस्थित केला आहे.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाच्या तपासावरुन केंद्र आणि राज्य सरकारमधील संघर्ष तीव्र झाला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करा, असा अर्ज सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय लाखे यांनी चौकशी आयोगाकडे केला आहे.
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने NIA नेमल्याने ‘सामना’च्या अग्रलेखातूनही शिवसेनेने मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. केंद्राचा महाराष्ट्रात हस्तक्षेप बरा नव्हे, प्रत्येक राज्याला स्वत:चे अधिकार आणि स्वाभिमान आहे. केंद्राची मनमानी अस्थिरतेला आमंत्रण देते, असं ‘सामना’त म्हटलं आहे.
काळोखात पाप करु नका, काय असेल ते उजेडात करा, ‘सामना’तून शिवसेनेचा केंद्र सरकारला इशारा
‘एनआयए’ने महाराष्ट्रात झडप घातली. अशी अनेक प्रकरणे भाजपशासित राज्यात घडत आहेत. त्या ठिकाणी केंद्राचा हस्तक्षेप का नाही? असाही सवाल ‘सामना’तून केंद्र सरकारला करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास अचानक राज्य सरकारकडून काढून घेत एनआयएला दिला. त्यानंतर या प्रकरणाची कागदपत्रं ताब्यात घेण्यासाठी पुण्यात आलेल्या एनआयएच्या पथकाला रिकाम्या हातीच माघारी परतावं लागलं. पुणे पोलिसांनी महासंचालकांच्या परवानगीशिवाय कोरेगाव भीमा प्रकरणाची कागदपत्रं एनआयएच्या ताब्यात देण्यास स्पष्ट नकार दिला.
Nawab Malik on Koregaon Bhima