हिंदुत्वासाठी सर्व माफ… केसरकरांनी राणे कुटुंबावर केलेल्या आरोपाला नितेश राणेंचं उत्तर; राजकारणात चाललंय काय?
दिशा सेलियन प्रकरण आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव घेऊन त्यांची बदनामी करण्याचा राणेंचा डाव होता, त्यामुळेच वारंवार आदित्य यांच्यावरून आरोप केले जात होते, असा सणसणीत आरोप केसरकर यांनी काल केला.
मुंबई : दीपक केसरकर (Dipak Kesarkar) आणि नारायण राणे (Narayan Rane) यांच्यातलं राजकीय वैर हे संपूर्ण महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिलं आहे. आता शिंदे-भाजप (BJP) सरकार आल्यानंतर तर हे वैर संपेल असं अनेकांना वाटत होतं. मात्र तरीही या वादाचा पुढचा अंक सुरूच राहिला, गेल्या काही दिवसांपूर्वीच निलेश राणे आणि दीपक केसरकर यांच्यात शाब्दिक चकमक आणि ट्विट युद्ध रंगल्याचे बघायला मिळाले. मात्र आता काल पुन्हा दिपक केसरकर यांच्या एका वाक्याने या वादाला नवं तोंड फुटलं आहे. दिशा सेलियन प्रकरण आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव घेऊन त्यांची बदनामी करण्याचा राणेंचा डाव होता, त्यामुळेच वारंवार आदित्य यांच्यावरून आरोप केले जात होते, असा सणसणीत आरोप केसरकर यांनी काल केला. त्यानंतर आता राणेंकडून पलटवार होणारच असंच गृहीत धरलं जात होतं.
नितेश राणेंचा यूटर्न
मात्र हिंदुत्वाचा हवाला देत नितेश राणेंनी आता थेट यूटर्न घेतलाय. राणेंच्या बाजूने मात्र राजन तेली यांनी दीपक केसरकर यांच्यावर पलटवार केलाय. मात्र आता थेट राणे यांनीच माघार घेतल्याने आता भाजप-शिंदे गटाच्या युतीमुळे काही दिवस का होईना, कोकणातलं हे राजकीय युद्ध तरी क्षमलंय का असा सवाल आणि त्यांच्या मनात आहे.
नितेश राणे नेमकं काय म्हणाले?
याबाबत बोलताना नितेश राणे म्हणाले, हिंदूत्वसाठी सर्व माफ आहे. आमच्यासाठी राज्यात हिंदूत्वाचं सरकार असणे आमच्या काळाची आणि महाराष्ट्राची गरज आह. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हिंदूंना टार्गेट केले जायचे. आम्हाला सण सूद पण साजरे करायला मिळायचे नाही. आज बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक मुख्यमंत्री आहे. एक प्रखर हिंदुत्ववादी आज उपमुख्यमंत्री आहेत. हिंदूत्वचे रक्षण करणे आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे, असे म्हणत नितेश राणेंनी केसरकरांचे आरोप थेट इग्नोर केले आहेत.
तेलींचा केसरकरांवर पलटवार
आज नारायण राणे यांचे कट्टर समर्थक,माजी आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी कणकवलीत पत्रकार परिषद घेऊन केसरकरांचा समाचार घेतला आहे. दीपक केसरकरांना आवरण्याची मागणी त्यांनी केली असून भाजपच्या नेत्यांनी काय बोलावे, काय करावे याच्याशी केसरकर यांचा संबंध नसल्याचे सांगत त्यांनी चांगलं वातावरण खराब करण्याचा केसरकर प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केसकर यांना समज देण्याची मागणी ही तेली यांनी केली आहे.