अधिकाऱ्यांचं बायकोपेक्षा फाईल्सवर प्रेम: गडकरी
गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा सरकारी अधिकाऱ्यांवर टोलेबाजी केली. ‘काही लोक पत्नीपेक्षा फाईलवर प्रेम करतात, फाईल दाबून ठेवतात. जोपर्यंत काही मिळत नाही फाईल दाबून ठेवतात’ हे वक्तव्य कुठल्या विरोधकाचं नाही तर, केंद्र सरकारचे दिग्गज मंत्री नितीन गडकरी यांचं आहे. हे वक्तव्य त्यांनी अधिकाऱ्यांना उद्देशून केलं असलं, तरी […]
गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा सरकारी अधिकाऱ्यांवर टोलेबाजी केली. ‘काही लोक पत्नीपेक्षा फाईलवर प्रेम करतात, फाईल दाबून ठेवतात. जोपर्यंत काही मिळत नाही फाईल दाबून ठेवतात’ हे वक्तव्य कुठल्या विरोधकाचं नाही तर, केंद्र सरकारचे दिग्गज मंत्री नितीन गडकरी यांचं आहे. हे वक्तव्य त्यांनी अधिकाऱ्यांना उद्देशून केलं असलं, तरी मंत्र्यांवरही त्यांचा निशाणा असल्याचं बोललं जात आहे. पण त्यांच्या या वक्तव्यावरुन मोदी सरकारच्या काळातही भ्रष्टाचार आहे, ही बाब त्यांनी मान्य केली. इंडियन रोड काँग्रेसच्या अधिवेशनात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
गडकरी म्हणाले, “आपल्याला पारदर्शी, निर्णायक आणि वेळेत कामं करायची आहेत. काही लोक असे आहेत, जे पत्नीपेक्षा जास्त फाईलवर प्रेम करतात. ते फाईल दाबून ठेवतात. एकवेळ मला अप्रामाणिक लोक आवडतात, जे चुकीचा का असेना पण निर्णय घेतात. पण मला प्रामाणिक लोक जे निर्णयच घेत नाहीत, ते आवडत नाहीत. निर्णय न घेणं हे सर्वात चुकीचं आहे ”
रस्ते अपघात हे चुकीचा डीपीआर आणि चुकीच्या इंजिनिअरींगमुळे होतात, असं म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांवर निशाणा साधला. त्यासाठी त्यांनी कोल्हापुरातील जयसिंगपूरमधील रस्त्याचं उदाहरण दिलं. जयसिंगपूरमध्ये चुकीच्या सर्व्हेमुळे रस्त्याला वळण द्यावं लागलं. मात्र तिथे शेकडो अपघाती मृत्यू झाले. तो रस्ता आता सरळ केला आहे, त्यामुळे अपघाताचं प्रमाण घटलं आहे, असं गडकरी म्हणाले.
लातूरमध्ये तीन ब्रीजकम बंधारे बांधण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे आता पुन्हा लातूरला कधी रेल्वेने पाणी आणण्याची आवश्यकता नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सरकारमध्ये एक पद्धत आहे, चांगलं काम करणाऱ्याचं कौतुक होत नाही आणि चुकीचं काम करणाऱ्याला शिक्षाही होत नाही, असंही गडकरींनी नमूद केलं.
इंडियन रोड काँग्रेसच्या या 79 व्या अधिवेशनात रस्ते विकासाबाबत मंथन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची उपस्थिती होती. याच कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी अधिकारी आणि काही मंत्र्यांना टोला लगावला.