पूरग्रस्त भागात पाणी शुद्धीकरणासाठी 1 कोटी क्लोरीनच्या गोळ्या
कोल्हापूर, सांगली भागात सुमारे 70 पेक्षा अधिक पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच पूरग्रस्त भागात सर्पदंशावरील लस, लेप्टोवरील गोळ्या आणि पाणी शुद्धीकरणासाठी 1 कोटी क्लोरीनच्या गोळ्यांचे वाटप केले जात आहे.
कोल्हापूर : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगलीत (kolhapur sangli flood) भीषण पूरस्थिती पाहायला मिळत आहे. या ठिकाणचे पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असली तरी यानंतर मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. यानुसार पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचे काम वैद्यकीय पथकांमार्फत करण्यात येत आहे. कोल्हापूर, सांगली भागात सुमारे 70 पेक्षा अधिक पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच पूरग्रस्त भागात सर्पदंशावरील लस, लेप्टोवरील गोळ्या आणि पाणी शुद्धीकरणासाठी 1 कोटी क्लोरीनच्या (chlorine tablets) गोळ्यांचे वाटप केले जात आहे.
पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या कामासह त्यांना आवश्यक ती वैद्यकीय मदतदेखील केली जात आहे. राज्यातील अन्य भागात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती असल्याने याठिकाणी 325 वैद्यकीय पथकं कार्यरत करण्यात आली आहेत. तसेच आरोग्य यंत्रणेच्या नियंत्रणासाठी व आरोग्य सेवेचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात तळ ठोकून आहेत.
राज्यातील अन्य भागापेक्षा कोल्हापूर, सांगली भागातील परिस्थिती बिकट आहे. या भागातील पुराचे पाणी कमी होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने स्वच्छता मोहीम आणि साथीच्या आजारांचा फैलाव होऊ नये यावर जास्त भर दिला आहे. अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
आरोग्य विभागामार्फत या दोन्ही जिल्ह्यांमध्ये 70 पेक्षा अधिक वैद्यकीय पथके कार्यरत केली आहेत. शिवाय रविवारी मुंबईहून 100 डॉक्टरांचे पथक, औषधांसह या दोन जिल्ह्यांमध्ये दाखल होणार आहे. पुराच्या पाण्यामुळे सांगली आणि कोल्हापूर भागात मानवी वस्तीत साप शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्पदंशावरील लसीचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करण्यात आला आहे. कोल्हापूरमध्ये 12 हजार तर सांगलीमध्ये 5 हजार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे.
पुराच्या पाण्यामुळे होणारा लेप्टोचा संभाव्य धोका ओळखून त्याच्यावरील उपचाराच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. सांगलीमध्ये 8 लाख आणि कोल्हापूरमध्ये 12 लाख डॉक्सिसायक्लिन गोळ्या देण्यात आल्या आहेत. तर 30 लाख गोळ्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. साथीच्या रोगांचा उद्रेक होऊ नये यासाठी नियंत्रण केले जात आहे. पूरग्रस्त भागात पिण्याच्या पाणी शुद्धीकरणासाठी एक कोटी क्लोरीनच्या गोळ्यांचे वाटप करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.