लोकआयुक्त कायद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी, अण्णा हजारे म्हणतात, ही समाधानाची गोष्ट पण,…
असा हा क्रांतीकारी कायदा आहे. लोकआयुक्तांचं काम हे भ्रष्टाचाराला आळा घालण्याचं असणार आहे.
अहमदनगर : लोकआयुक्त कायद्याला राज्य मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली आहे. या कायद्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लढा दिला होता. लोकआयुक्त कायदा होणार आहे. त्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ही समाधानाची गोष्ट असल्याचं अण्णा हजारे यांनी सांगितलं. लोकआयुक्त हा स्वायत्तता असणारा कायदा आहे. त्याचा दर्जा उच्च न्यायालयाच्या बरोबर आहे. कायदे खूप आहेत. पण, पालन केलं नाही, तर कोणी विचारत नाहीत, अशी खंतही अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.
लोकआयुक्त नेमल्यास त्यांना स्वायत्तता मिळणार आहे. जेकाही दिसेल त्याच्यावर कारवाई करते. असा हा क्रांतीकारी कायदा आहे. लोकआयुक्तांचं काम हे भ्रष्टाचाराला आळा घालण्याचं असणार आहे. केंद्र सरकारचे अधिकारी आणि मंत्री लोकपालाच्या कक्षात येतील. तसेच राज्यातील अधिकारी आणि मंत्री लोकआयुक्तांच्या कक्षात येतील. यासाठी अण्णा हजारे यांनी मोठा संघर्ष केला होता.
पक्ष, व्यक्ती यांच्याशी काही घेणंदेणं नाही. सर्व पक्षांच्या विरोधात मी आंदोलनं केलीत. त्यासाठी मी समाज आणि राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवलं. या कायद्यासाठी आंदोलन २०११ मध्ये केलं होतं. आता याला १२ वर्षे झालीत. १२ वर्षांच्या तपानंतर सरकारनं हा निर्णय घेतला. कोणत्याही गोष्टीसाठी तप करावं लागतं. आता हे तप पूर्ण झाल्याचंही अण्णा हजारे यांनी सांगितलं.
सत्तेमध्ये बुद्धी विचार कुठं घेऊन जातील, काही सांगता येत नाही. ज्यांना देशासाठी काही करावसं वाटतं, तीच माणसं अशाप्रकारचे निर्णय घेतात. देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आश्वासन दिलं होतं. त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चार अधिकारी आणि इतर जणांनी मिळून ड्राफ्ट तयार केला. आता तो विधानसभेत गेला.