पुणे नाशिकमध्ये गोंधळ, प्रश्नपत्रिका देण्यास उशीर का झाला? राजेश टोपेंकडून स्पष्टीकरण
पुण्याच्या केंद्रावर ती पाच ते दहा मिनिट उशिरा प्रश्नपत्रिका मिळण्याचे कारण हे प्रश्नपत्रिकेच्या बॉक्सवरील डिजीटल लॉक वेळेत न उघडल्यामुळे झाल्याचंही स्पष्टीकरण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले.
जालना : आरोग्य विभागाच्या नाशिक आणि पुणे येथील गोंधळावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले. पुणे येथे विद्यार्थ्यांना दहा मिनिटे उशीर झालेला वेळ भरून काढण्यात येईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्री यांनी दिली. पुण्याच्या केंद्रावर ती पाच ते दहा मिनिट उशिरा प्रश्नपत्रिका मिळण्याचे कारण हे प्रश्नपत्रिकेच्या बॉक्सवरील डिजीटल लॉक वेळेत न उघडल्यामुळे झाल्याचंही स्पष्टीकरण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले.
विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देणार तर न्यासा कंपनीवर कारवाई
आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.संजोग कदम आरोग्य विभागाच्या परीक्षा केंद्रावर झालेल्या गोंधळ प्रकरणी खुलासा केला आहे. न्यासा कंपनीला परीक्षेचे काम दिले आहे त्या कंपनीवर गोंधळाबद्दल कारवाई केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना वेळ वाढवून दिला जाणार असल्याचं संजोग कदम यांनी म्हटलंय. परीक्षेच्या वेळेनंतर 1 तासांनी आरोग्य विभागाचे अधिकारी परीक्षा केंद्रावर पोहचलेत. विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला आहे.
पुणे आणि नाशिकमध्ये गोंधळ
पुण्यातील आझम कॅम्पस येथील परीक्षा केंद्रावर 10 ची वेळ देण्यात आलेली असताना तिथे पर्यवेक्षक, परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचल्या नसल्याचं समोर आलं आहे. परीक्षा केंद्रावर सुपरवायझर आले नसल्यानं विद्यार्थी संतप्त झाले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील गिरणारे परीक्षा केंद्रावर देखील गोंधळ पाहायला मिळाला. पेपर प्रक्रिया राबवणाऱ्या व्यवस्थेवर विद्यार्थ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. विद्यार्थी संख्ंयेच्या कमी प्रमाणात प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्यानं विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. प्रश्न पत्रिका घेऊन येणाऱ्यांकडे ओळखपत्र नसल्याचा दावा देखील विद्यार्थ्यांनी केला.
पुण्यात परीक्षेला सुरुवात
दरम्यान, पुण्यात 11.30 वाजता आरोग्य विभागाची परीक्षा संबधित परीक्षा केंद्रावर सुरु झाली असून वरिष्ठांना घडलेल्या प्रकाराची माहिती कळवणार असल्याचं संजोग कदम यांनी म्हटलंय.
विद्यार्थी संतप्त
आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी राज्य सरकार, आरोग्य विभागाविरोधात संताप केला आहे. आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळं विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. दोन दोन वेळा परीक्षा द्यायला यावं लागतंय. सिंधुदुर्ग, बीड मधून विद्यार्थी पुण्यात परीक्षेसाठी दाखल झाले होते. विद्यार्थ्यांनी तीन तीन हजार रुपये खर्चून परीक्षेसाठी आलो असल्याचं म्हटलंय.
इतर बातम्या:
Rajesh Tope said Health department exam extra time will given to students at exam centres in Pune and Nashik