पंढरपूरच्या रुक्मिणीमातेच्या 5 हजार साड्या पूरग्रस्त महिलांना
पंढरपूरच्या 'श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर' समितीने पूरग्रस्त महिलांना मदत जाहीर केली आहे. डोळ्यादेखत संसार उद्ध्वस्त झालेल्या कोल्हापूर आणि सांगलीच्या पूरग्रस्त महिलांना रुक्मिणीमातेला दान स्वरुपात आलेल्या पाच हजार साड्या मदत म्हणून देण्यात येणार आहे.
मुंबई : महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूराने हाहा:कार माजवला आहे. कधी नव्हे इतकं 15 फुटांपर्यंत पाणी या भागात साचलं आहे. कृष्णा, कोयना, पंचगंगा नद्यांना आलेल्या पुराने कोल्हापूर-सांगलीकरांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. अनेकांना त्यांची घरे सोडून स्थलांतरित व्हावं लागलं आहे. आतापर्यंत सागंली-कोल्हापुरातून 3 लाख 78 हजार लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. या दोन्ही जिल्ह्यात पुराने थैमान घातलं आहे. कालपर्यंत ज्या शेतात पेरणी सुरु होती, ती शेतं, लोकांची घरं अख्खी पाण्याखाली गेली आहेत. या महाप्रलयातून लोकांना सुखरुप बाहेर काढण्याचं काम सरकार करत आहे. त्यांना सर्वोतोपरी मदतही सरकारकडून केली जात आहे. मात्र, त्यासोबत अनेक सामाजिक संस्था आणि देवस्थानंही या पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहेत.
रुक्मिणीमातेच्या 5 हजार साड्या पूरग्रस्त महिलांना देणार
पंढरपूरच्या ‘श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर’ समितीने पूरग्रस्त महिलांना मदत जाहीर केली आहे. डोळ्यादेखत संसार उद्ध्वस्त झालेल्या कोल्हापूर आणि सांगलीच्या पूरग्रस्त महिलांना रुक्मिणीमातेला दान स्वरुपात आलेल्या पाच हजार साड्या मदत म्हणून देण्यात येणार आहे. समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी ही माहिती दिली. त्याशिवाय, सांगलीच्या पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ या गावातील बोट दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांनाही मंदिर समितीने मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण अद्यापही बेपत्ता आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मंदिर समितीकडून प्रत्येकी दोन लांख रुपयांची मदत केली जाणार आहे. तर दुर्घटनेतील जखमींना प्रत्येकी एक लाखाची आर्थिक मदत समितीने जाहीर केली.
या महाप्रलयात पूर्ण उद्ध्वस्त झालेल्या पाच गावांच्या पुर्नउभारणीसाठीही पंढरपूर ‘विठ्ठल रुकिमणी मंदिर’ समिती आर्थिक मदत करणार असल्याची माहिती मंदिर समिती अध्यक्ष डॉ. अतूल भोसले यांनी कराड येथील पत्रकार परिषदेत दिली.
सिद्धिविनायक ट्रस्टचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात पुरामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. मात्र, याचं पुरामुळे या जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सिद्धिविनायक मंदिर न्यास पुढे सरसावलं आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा करणार आहे. त्यासाठी तब्बल 100 ट्रक भरून पाण्याच्या बाटल्या या पूरग्रस्त भागात पाठवण्यात येणार आहे. एका ट्रकमध्ये 10 हजार पाण्याच्या बाटल्या, अशा एकूण 10 लाख शुद्ध पाण्याच्या बाटल्यांचा पूरवठा सिद्धिविनायक मंदिर न्यास करणार आहे. ही मदत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हाअधिकाऱ्यांकडे सोपवली जाणार आहे, अशी माहिती सिद्धिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली.
साई बाबा संस्थानकडून पूरग्रस्तांना 10 कोटींची मदत
शिर्डी साईबाबा संस्थानकडूनही कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्याच्या पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे. साई संस्थानकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 10 कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे. त्याशिवाय, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 20 डॉक्टरांटी चमू आणि औषधांचा स्टॉक तयार असल्याची माहितीही संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली.
“राज्यात मुसळधार पावसामुळे भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या जलप्रलयाच्या थैमानामुळे विशेषताः पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं असून परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे. यामुळे हजारो नागरिक बेघर झाले आहेत. अनेक गावंही उद्ध्वस्त झाली आहेत. ही नैसर्गिक आपत्ती भीषण असून आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून या पुरग्रस्तांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीच्या वतीने घेण्यात आलेला आहे. हा निधी न्यायालयीन प्रक्रियेस अधिन राहून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार आहे. तसेच, संस्थानच्या वतीने परिस्थिती बघून वैद्यकीय पथक आणि औषधेही पाठविणार आहे”, असं हावरे यांनी सांगितल.
त्याशिवाय शिर्डी, अंबाबाई, आर्ट ऑफ लिव्हिंग यासारख्या अनेक देवस्थानांकडूनही पूरग्रस्तांना मदत होत आहे.
VIDEO :