पवार एकत्रित कुटुंबाबाबत चांगलं सांगतात, पण माझ्या भावाला शिकवत नाहीत : पंकजा मुंडे
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काही ठराविक कुटुंब चर्चेत आहेत. यामध्ये एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं कुटुंब. पवार हे कुटुंबात धुसफूस असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आणि त्यानंतर राजकीय वातावरण तापलं. आमच्या कुटुंबात सगळं काही आलबेल असल्याचं पवार म्हणाले. पवार एकत्रित कुटुंबाबाबत चागलं सांगतात, पण ते माझ्या भावाला शिकवत नाहीत, […]
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काही ठराविक कुटुंब चर्चेत आहेत. यामध्ये एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं कुटुंब. पवार हे कुटुंबात धुसफूस असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आणि त्यानंतर राजकीय वातावरण तापलं. आमच्या कुटुंबात सगळं काही आलबेल असल्याचं पवार म्हणाले. पवार एकत्रित कुटुंबाबाबत चागलं सांगतात, पण ते माझ्या भावाला शिकवत नाहीत, असा टोला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी लगावला.
अहमदनगरचे भाजप उमेदवार सुजय विखे यांच्यासाठी पंकजा मुंडे यांची जिल्ह्यातील शेवगावमध्ये सभा झाली. या सभेत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. तर दोन धर्मातलं ऐक्य पाहून काँग्रेसच्या पोटात दुखतं, तसेच दोन जातींमधील सलोख्याने राष्ट्रवादीच्या पोटात दुखतं, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली.
राजकारणात नातीगोती असतात आणि ती सांभाळली पाहिजेत, असं मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केलं. पवार आमचा परिवार एक आहे असं सांगतात. मात्र माझ्या भावाला शिकवत नाहीत, असा टोला त्यांनी लगावल. तिकडे बहीण-भाऊ सोबत सेल्फी काढतात, पण इकडे पंकजाची पात्रता नाही, प्रितमची पात्रता नाही असं म्हणून त्यांनी आम्हाला संपवायचा विडाच उचललाय, असं पंकजा म्हणाल्या.
मोदींवर टीका करताना देशामध्ये गरीबी संपलेली नाही असं राहुल गांधी सांगतात. पण तुमचे पंजोबा प्रधानमंत्री, आजी प्रधानमंत्री, वडील प्रधानमंत्री दहा वर्षे पंतप्रधानाचा रिमोट तुमच्या हातात, तरी देखील तुम्ही विचारताय गरीबी का कमी नाही झाली, असा सवाल पंकजा यांनी उपस्थित केला. मोदींना मिरवतात म्हणून टीका केली जाते. यांनी काय केलंय आतापर्यंत? गांधी कुटुंब आणि पवारांनाच मिरवतात ना, स्वतः परिवारवादी आहेत आणि मोदींना परिवारवाद शिकवतात, असंही पंकजा म्हणाल्या.
नगर दक्षिण मतदारसंघासाठी महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात राज्यातील जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या 14 जागांसाठी मतदान होईल. लोकसभेचा निकाल 23 मे रोजी लागणार आहे.