महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरील फोटो प्रदर्शनाची ‘या’ कारणामुळे होतेय चर्चा
भाकपने स्पर्धेत आलेल्या रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटो आणि कवितांचे प्रिंट काढून पालिकेच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीला लावून प्रदर्शन भरवलं होतं.
Nashik News : नाशिकमधील (Nashik) रस्त्यावरील खड्डे (Road potholes) हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. मुसळधार पावसाने अक्षरशः रस्त्यांची चाळण झाल्याने रस्त्याच्या दर्जेवर नागरिकांचा संताप होत आहे. नागरिकांना खड्ड्यांचा प्रचंड त्रास होत असल्याने भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (Bhakap) स्मार्ट खड्डे म्हणत विविध निदर्शने सुरू केली आहे. मागील महिन्यात भाकपने नाशिक शहरात कवींना एकत्र घेऊन येत रस्त्यावरील खड्ड्यांवर स्मार्ट खड्डे कवी संमेलन भरविले होते. त्यानंतर स्मार्ट खड्डे फोटो स्पर्धा देखील आयोजित केली होती. त्याचे बक्षीस वितरण आणि प्रदर्शन असा संयुक्त कार्यक्रम नाशिक महानगर पालिकेच्या (NMC) प्रवेशद्वारावर आज पार पडलाय. अनोखे प्रदर्शन पाहण्यासाठी रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनी या प्रदर्शनाचे कौतुक देखील केले आहे.
नाशिक शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवर भरलेल्या कवी संमेलनात अनेक कवींनी सहभाग घेतला होता.
याशिवाय स्मार्ट खड्ड्यांची फोटो स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती., त्यात अनेकांनी स्मार्ट खड्डे म्हणून फोटो काढून पाठवत या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
खरंतर या स्पर्धा नशिक शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांनी त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी संताप व्यक्त करण्यासाठी आयोजित केल्या होत्या.
संतप्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग घेतल्याने चांगला प्रतिसाद मिळाला होता. या स्पर्धा आंदोलनाचा भाग असल्याने निदर्शने करत असतांना पालिकेच्या प्रवेशद्वारावर बक्षीस वितरण करण्यात आले.
भाकपने स्पर्धेत आलेल्या रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटो आणि कवितांचे प्रिंट काढून पालिकेच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीला लावून प्रदर्शन भरवलं होतं.
उपरोधिक पद्धतीने केलेल्या प्रदर्शनाने येणाऱ्या – जाणारया नागरिकांनी प्रदर्शन भरविणाऱ्या भाकप पदाधिकाऱ्यांचे कौतुकही केले.
खरंतर भाकपने प्रदर्शन भरवत अनोख्या पद्धतीने गांधीगिरी करत नागरिकांना त्यात सहभागी करून घेतले होते. त्यामुळे पालिका वर्तुळात देखील या आंदोलनाची चर्चा होऊ लागली आहे.
येत्या काळातही खड्डेमुक्त शहर करण्यासाठी असे उपक्रम घेऊन नागरिकांचे प्रश्न मांडत राहणार असल्याचे भाकप पदाधिकारी राजू देसले यांनी सांगितले आहे.