गुवाहटीतील बंडखोरांना आता महाराष्ट्रात यावंच लागेल, मंत्र्यांविरोधात हायकोर्टात जनहित याचिका, काय म्हणाले अॅड. असीम सरोदे?
आमदारांनी बंड पुकारल्यामुळे मागील सात दिवासंपासून प्रत्येक लोकप्रतिनिधींच्या मतदार संघातील कामं खोळंबली आहेत. महाराष्ट्राबाहेर असलेल्या बंडखोरांनी तत्काळ विधानभवनात हजर व्हावं, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.
मुंबईः आठवडाभरापासून गुवाहटीत (MLAs in Giwahati) जाऊन बसलेल्या शिवसेना आमदार आणि मंत्र्यांना आता महाराष्ट्रात येऊन लोकांना तोंड द्यावंच लागणार आहे. जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी अशा प्रकारे एवढे दिवस कामावर गैरहजर राहू शकत नाहीत. मुख्यमंत्र्यांना (CM Uddhav Thackeray) विश्वासात न घेता, अन ऑफिशिअल कामांसाठी अशा प्रकारे राज्याबाहेर जाणं ही जनतेची शुद्ध फसवणूक आहे, असा आरोप आता बंडखोर आमदारांविरोधात केला जातोय. याच कारणासाठी राज्यातील काही सजग नागरिकांच्या वतीने अॅड. असीम सरोदे (Add Aseem Sarode) यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर कामावर रूजू व्हावे, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
अॅड असीम सरोदे काय म्हणाले?
सामाजिक विषयावर काम करणारे लोकांतर्फे ही याचिका दाखल झाली आहे. शेड्यूल ३ नुसार या मंत्र्यांनी शपथ घेतलेली असते की ते कर्तव्याचं वहन करतील. कर्तव्य त्यांच्यासाठी प्रथमस्थानी राहिल. या शपथेचं पालन मंत्री करत नाहीयेत. त्यानंतर दुसरा एक साधा नियम असतो, मंत्री स्वतःच्या कामासाठी बाहेर जात असतील तर त्यांनी त्या त्या विभागाचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांना याविषयी कल्पना दिली पाहिजे. संबंधित खात्यातील निर्णय घेण्याचे अधिकार त्यांच्याकडे असतात. त्यांच्या सहीमुळे बरीचशी कामे अडू शकतात, हा त्यामागील उद्देश असतो. या पार्श्वभूमीवर काहीही न सांगता राजकीय स्वार्थासाठी त्यांनी निघून जाणं ही महाराष्ट्रातील जनतेची प्रतारणा आहे. जनतेचा अपमान आहे. त्याचबरोबर सामाजिक उपद्रव मंत्रीपदावरील व्यक्तींनी केलाय. त्यामुळे हायकोर्टानं त्यांना त्वरीत कामावर रूजू होण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आम्ही याचिकेतून केली आहे.
बंडाचे सात दिवस, महाराष्ट्र खोळंबला
विधन परिषद निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजेच 20 जूनच्या रात्रीतूनच बंडखोर आमदार आणि मंत्री महाराष्ट्रातून निघून गेलेत. आधी सूरत आणि त्यानंतर गुवाहटीत हे लोकप्रतिनिधी ठाण मांडून बसले आहेत. महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाराज होऊन निघून गेलेल्या मंत्र्यांमुळे इकडे महाराष्ट्रातील सरकार अस्थिर झालं आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला सोडून मातोश्रीवर जाणे पसंत केले. तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या, म्हणत असाल तर तोही देईन, असं म्हणालेत. फक्त आमदारांनी एकदा समोरासमोर येऊन बोलावं, असं आवाहन त्यांनी केलंय. मात्र सत्तानाट्याचा कायदेशीर पेच सुटल्याशिवाय बंडखोर महाराष्ट्रात येण्यास तयार नाहीयेत. आज या सत्तानाच्या विषयीच्या खटल्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यातच मुंबई हायकोर्टात सजग नागरिकांच्या वतीने जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. आमदारांनी बंड पुकारल्यामुळे मागील सात दिवासंपासून प्रत्येक लोकप्रतिनिधींच्या मतदार संघातील कामं खोळंबली आहेत. मान्सून लांबल्यानं काही भागात दुबार पेरणीचं संकट निर्माण झालंय तर कुठे अतिवृष्टीमुळे लोकांचे हाल होतायत. अशा वेळी लोकप्रतिनिधींनी तत्काळ विधानभवनात हजर व्हावं, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.