खेडमध्ये जमिनीचा वाद, कर्नलने सैन्यातील जवान गावात आणल्याचा आरोप
खेड तालुक्यातील गुळाणी गावात 64 एकर जमिनीचा वाद इतका विकोपाला गेला आहे की, कर्नल केदार गायकवाड यांनी चक्क त्यांच्याच गावात शनिवारी सैन्यचे जवान आणले.
पुणे : खेड तालुक्यातील गुळाणी गावात 64 एकर जमिनीचा वाद इतका विकोपाला गेला आहे की, कर्नल केदार गायकवाड यांनी चक्क त्यांच्याच गावात शनिवारी सैन्यचे जवान आणले. कर्नल केदार गायकवाड यांनी ही वादातील जमीन आपल्या मालकीची असल्याचा दावा केला आहे. आपली वडिलोपार्जित जमीन सुनील भरणे यांनी फसवून खरेदी केल्याचा आरोप कर्नल गायकवाड यांनी केला आहे. मात्र भरणे यांनी हा आरोप फेटाळला आहे.
सध्या वादग्रस्त जमीन सुनील भरणे यांच्या ताब्यात आहे. त्यांनी काही वर्षांपूर्वी ही जमीन खरेदी केल्याचं सांगण्यात येत आहे. तेव्हापासून भरणेच जमीन कसत आहेत. त्यामुळे कर्नल केदार गायकवाड यांनी शनिवारी गावात सैन्यदलाचे जवान आणत, शेतातील पीकाची नासाडी केल्याचा आरोप आहे.
वादग्रस्त जमीनाचा वाद सध्या न्यायालयात आहे. मात्र कर्नल गायकवाड दादागिरी करत असल्याचा भरणे यांचा आरोप आहे.
या जमिनीच्या वादातून यापूर्वीही एकमेकांवरती राजगुरुनगर पोलीस स्थानकात गुन्हे दाखल आहेत. आता त्यात आणखी एका गुन्ह्याची भर पडली आहे. याप्रकरणी उच्च अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे.
गुळाणी गावात शनिवारी मिलिट्रीचे मोठे ट्रक गावात आले होते. त्यामुळे हे ट्रक नेमके कशासाठी आले याचीच गावभर चर्चा होती.