माझ्या बदनामीचं षडयंत्र, काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही : राधाकृष्ण विखे पाटील
भाजपकडून पक्षविरोधी काम केल्याचा आरोप झेलत असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्याविरोधात बदनामीचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप केला (Radhakrishna Vikhe Patil on disciplinary action).
अहमदनगर : भाजपकडून पक्षविरोधी काम केल्याचा आरोप झेलत असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्याविरोधात बदनामीचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप केला (Radhakrishna Vikhe Patil on disciplinary action). यावेळी विखे यांनी मल्लिकार्जून खर्गे यांच्यासोबत कोणतीही भेट झाली नसल्याचं म्हटलं. मागील काही काळापासून विखे पिता-पुत्रांवर विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केल्याचा आरोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विखे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली (Radhakrishna Vikhe Patil on disciplinary action).
राधाकृष्ण विखे म्हणाले, “माझ्या बदनामीचं षडयंत्र रचलं जात आहे. माझी आणि मल्लिकार्जून खर्गे यांची भेट झालेली नाही. काँग्रेस पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जे षडयंत्र रचत आहेत त्याच्या मुळाशी जाण्यासाठी खोट्या बातम्यांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करणार आहे.”
विखे यांनी यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, “बाळासाहेब थोरात यांची किव येते. काँग्रस अपघाताने सत्तेत आले आहेत. उलट थोरात अध्यक्ष झाल्यापासून काँग्रेसचा फुटबॉलच झाला आहे.”
पक्षाची एक शिस्त आहे. त्यामुळे पक्षाची अंतर्गत भांडणं चार चौकटीतच मांडायला हवीत. मी पक्षाकडे माझी भूमिका मांडली आहे. त्यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असं मत विखेंनी व्यक्त केलं. ते राम शिंदे यांच्या आरोपावर बोलत होते.
अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीबाबत अद्याप ठरवलेलं नाही. आज (28 डिसेंबर) भाजपच्या बैठकीत यावर निर्णय होईल, असंही विखेंनी नमूद केलं. महाविकास आघाडीचा नविन संसार आत्ताच सुरू झाला आहे. काळाच्या ओघात त्यांना एकमेकांचे गुण आणि खोडी कळतील, असा छोचक टोलाही विखेंनी लगावला.