पाऊस LIVE : राज्यभरात पावसाचा जोर, अनेक जिल्ह्यात पूरस्थिती
मुंबईसह राज्यभरात पावसाचा(Rain) जोर कायम आहे. मुंबईसह उपनगरात संततधार सुरुच आहे. याशिवाय कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं आहे.
Rain Live मुंबई : मुंबईसह राज्यभरात पावसाचा(Rain) जोर कायम आहे. मुंबईसह उपनगरात संततधार सुरुच आहे. याशिवाय कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, या जिल्ह्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे.
तिकडे उत्तर महाराष्ट्रात नाशिकला पावसाने झोडपून काढलं आहे. जळगाव, धुळ्यातही पाऊस सुरु आहे. तर मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर गंगापूर आणि पैठण तालुक्यात पूरस्थिती आहे. गोदावरी नदीला पूर आला आहे. नांदूर मधमेश्वर आणि गंगापूर धरणातून पाण्याचा गोदावरी नदीत विसर्ग होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
#औरंगाबाद : गोदावरी नदीला पूर, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर गंगापूर आणि पैठण तालुक्यात पूरस्थिती, नांदूर मधमेश्वर आणि गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, छोट्या पुलावरुन सुरु असलेली वाहतूक थांबवली pic.twitter.com/DW52Cc46ww
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 30, 2019
पुणे
खडकवासला धरणातून दहा वाजता 13 हजार 981 पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पाण्याचा विसर्ग वाढल्याने मुठा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. पाणीपातळी वाढल्याने नदीपात्रातील रस्त्यांवरही पाणी आलं आहे. नदीपात्रातील दोन्ही बाजूचे रस्ते सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्याचा निर्णय मनपाने घेतला. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन मनपाने केलं. नदीपात्राच्या परिसरात मनपा कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
नदीपात्रातील रस्ते वाहतुकीचा वापर करू नये, वाहने उभी करू नयेत,उभी केलेली वाहने सुरक्षित जागी हलविण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत. नदीपात्रातील दोन्ही बाजूचे रस्ते बंद झाल्यानं पुण्याच्या वाहतूक कोंडीत आणखी पडत आहे.
कोल्हापूर
#कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा तलाव ओव्हर फ्लो, जिल्ह्यात सर्वच तालुक्यात तुफान पाऊस pic.twitter.com/Hr3b61mboe
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 30, 2019
वसई विरारमध्ये जोरदार पाऊस
वसई : वसई विरार नालासोपाऱ्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून रिमझिम पडणाऱ्या पावसाने दुपारी 12 नंतर जोर धरला आहे. जोरदार पावसामुळे शहरातील सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. विरार पूर्व भागातील भाताने पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्याने 10 ते 12 गावाचा संपर्क तुटला आहे. तेथील गावांना 40 ते 50 किलोमीटरचा वळसा घालून शहराशी संपर्क साधावा लागत असल्याने, नागरिकांचे हाल सुरू आहेत. वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धामनी धरण भरल्याने दरवाचे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वसई तालुक्यातील ग्रामीण भागातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत.
नाशिक
नाशिक : नांदूर मधमेश्वर धरणातून 58 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने सायखेडा येथील नदीकाठच्या वीटभट्ट्या पाण्यात गेल्या आहेत. चांदोरी येथील खंडेराव मंदिर पाण्यात गेले आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर येथील पावसामुळे मोठ्या प्रमाणात नद्यांमध्ये विसर्ग होत असल्याने नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाली आहे.
दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील जायकवाडी धरणाच्या दिशेने आत्तापर्यंत नांदूर-मधमेश्वर धरणातून 7 टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला आहे.
नाशिक जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात संततधार सुरु आहे. 4 धरणांतून विसर्ग सुरु आहे. दारणा धरणांतून 13058 क्यूसेक प्रती सेकंद विसर्ग सुरू आहे तर भावली धरणांतून 948 क्यूसेक प्रती सेकंद विसर्ग सुरू असून, गंगापूर धरणांतून 7833 क्यूसेक प्रती सेकंद विसर्ग सुरू आहे. तिकडे नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून 53304 क्यूसेक प्रती सेकंद पाणी सोडण्यात येत आहे.
गोदावरी नदीला यंदाच्या पावसाळ्यातील पहिला पूर आला आहे. त्यामुळे दुतोंडया मारुती कमरेपर्यंत बुडाला आहे.
सातारा
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील येणके-पोतले पूल पाण्याखाली गेला. वांग नदीला आलेल्या पाण्यामुळे पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर आजूबाजूच्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
चंद्रपूर :
चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. गेल्या 24 तासात चंद्रपुरात सरासरी 88 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 15 पैकी 12 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. सिंदेवाही तालुक्यात सर्वाधिक 140 मिमी पावसाची नोंद झाली. मूल 116 मिमी, सावली 112 मिमी, गोंडपिंपरी 101 मिमी, चंद्रपूर 98 मिमी इतकी पावसाची नोंद झाली.
गडचिरोली:
पर्लाकोटा नदीला पूर आल्याने 100 गावांचा संपर्क तुटला आहे. ओदिशामध्ये होत असलेल्या पावसामुळे इंद्रावती नदीला पूर आला आहे. भामरागड तालुक्याची दूरध्वनी आणि विघुत सेवा खंडित करण्यात आली आहे. रस्त्यावर चार ते पाच फूट पाणी भरल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या 24 तासापासुन सुरु असलेल्या पावसाने सकाळी काहीशी विश्रांती घेतली.