रत्नागिरीतील बेपत्ता मच्छिमारी बोटीचं रहस्य दीड महिन्याने उलगडलं, समुद्राच्या तळाशी अवशेष
26 ऑक्टोबरपासून जयगडमधील मासेमारी बोटीचा संपर्क तुटल्याने चिंतेचं वातावरण होते.. नावेद-2 या नौकेवर तांडेलसह आठ खलाशी होते. मात्र एका खलाशाचा मृतदेह सापडल्यानंतर बेपत्ता बोटीविषयी भीती वाढली होती.
रत्नागिरी : रत्नागिरीतील जयगड बंदरातून बेपत्ता झालेल्या ‘नावेद 2’ या मच्छिमारी बोटीचे रहस्य आता उलगडले आहे. या बोटीचे अवशेष सापडल्यामुळे तिचा अपघात झाल्याचं स्पष्ट झालं होतं. यानंतर बोट मालकांनी दिलेल्या तक्रारीवरून जयगड बंदरातील फत्तेगड मालवाहू जहाजावरील कॅप्टन आणि क्रू मेंबर विरोधात जयगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जयगड पोलिसांनी दिली. समुद्राच्या तळाशी असलेली नौका काढण्यासाठी स्कुबा डायव्हरची मदत घेतली जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांना पत्र
बोट अपघाताची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिण्यात आलं होतं. भाजपचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलं होतं. नावेद 2 नावाची मच्छिमारी बोट 26 ऑक्टोबरपासून बेपत्ता होती. नासीर हुसैन मिया संसारे यांच्या मालकीची ही मासेमारी नौका आहे. या बोटीवर तांडेल दगडु, गोविंद, दत्ता, अमोल, सूर्या, अनिल असे एकूण आठ खलाशी आहेत. हे सर्व साखरी आगर येथील रहिवासी होते. त्यातील एकाचा मृतदेह नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला समुद्रात सापडला होता.
खलाशाचा मृतदेह सापडला
रत्नागिरीतील नौकेवरील एका खलाशाचा मृतदेह 31 ऑक्टोबरला सापडला होता. 45 वर्षीय अनिल आंबेरकर यांच्या मृतदेहाची ओळख पटली होती, तर उर्वरित खलाशांचा शोध घेतला जात होता. 26 ऑक्टोबरपासून जयगडमधील मासेमारी बोटीचा संपर्क तुटल्याने चिंतेचं वातावरण होते.. नावेद-2 या नौकेवर तांडेलसह आठ खलाशी होते. मात्र एका खलाशाचा मृतदेह सापडल्यानंतर बेपत्ता बोटीविषयी भीती वाढली होती.
समुद्रात गेलेली नौका बेपत्ता
नावेद-2 ही नौका मासेमारीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथून 26 ऑक्टोबरला समुद्रात गेली होती. मात्र नौकेशी कोणताही संपर्क न झाल्याने बोट मालकाने जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर खोल समुद्रात प्रशासनाच्या तीन स्पीड बोटी, कोस्टगार्डची एक स्पीड बोट आणि काही खासगी बोटींनी युद्ध पातळीवर ‘सर्च ऑपरेशन’ सुरु केले.
संबंधित बातम्या :
रत्नागिरीतील नौका समुद्रात बेपत्ता, सहा खलाशांसोबत पाच दिवसांपासून संपर्क नाही
रत्नागिरीतील बेपत्ता नौकेचे गूढ वाढले, समुद्रात अपघाताचा संशय, मुख्यमंत्र्यांना मदतीसाठी पत्र