या सात कारणांमुळे नगरमधून विद्यमान खासदार दिलीप गांधींचा पत्ता कट?
अहमदनगर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी अखेर भाजपचा झेंडा हातात घेतला. भाजपने त्यांना अहमदनगरमधून लोकसभेचं तिकीट देण्याची घोषणाही केली आहे. त्यामुळे भाजपचे नगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट झालाय. गांधींनीही सुजय विखेंचं पक्षात स्वागत केलंय. शिवाय आपण पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असून पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करत राहू, […]
अहमदनगर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी अखेर भाजपचा झेंडा हातात घेतला. भाजपने त्यांना अहमदनगरमधून लोकसभेचं तिकीट देण्याची घोषणाही केली आहे. त्यामुळे भाजपचे नगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट झालाय. गांधींनीही सुजय विखेंचं पक्षात स्वागत केलंय. शिवाय आपण पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असून पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करत राहू, असं दिलीप गांधींनी म्हटलंय.
अहमदनगर दक्षिण मतदारसंघात भाजपचं वर्चस्व आहे. मात्र खासदार दिलीप गांधींच्या विरोधात मोठ्या प्रमाणात पक्षांतर्गत नाराजी आहे. गांधी आणि वाद हे समीकरण नेहमीचं आहे. सहाही मतदारसंघात गांधींना पक्षांतर्गत विरोध आहे. तर शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या घोटाळ्यांच्या पुस्तिकेत दिलीप गांधींचा समावेश आहे. गांधी अध्यक्ष असलेल्या अर्बन बँकेत घोटाळ्याचा आरोप गांधींवर असून न्यायालयात सुनावणी सुरु आहे.
खासदार दिलीप गांधी आणि वाद
नगर शहर –
शहरात गांधींच्या विरोधात शिवसेना आक्रमक तर आहेच, मात्र भाजपातील आगरकर गट गांधींच्या विरोधात आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केल्याचा गांधींवर आरोप आहे.
शेवगाव – पाथर्डी –
शेवगाव – पाथर्डी मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्यात गटबाजी आहे. राजळे विरोधकांना खतपाणी घालत असल्याचा गांधींवर आरोप आहे.
कर्जत – जामखेड –
कर्जत – जामखेड या मंत्री राम शिंदेंच्या मतदारसंघातही शिंदे आणि गांधी यांचं फारसं सख्य नाही.
श्रीगोंदा –
श्रीगोंदा मतदारसंघात भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते हे प्रबळ नेते आहेत. तिथेही मूळ भाजपा आणि पाचपुते यांच्यात गांधींचा कलह आहे.
राहुरी –
राहुरी मतदारसंघात भाजप आमदार शिवाजी कर्डिले आणि गांधींचा फारसा सलोखा नाही. कर्डिले यांना मानणारा हा मतदारसंघ आहे.
पारनेर –
पारनेर मतदारसंघात शिवसेनेचे आमदार विजय औटी यांना मानणारे कार्यकर्ते आहे. इथे भाजपाला फारसा जनाधार नाही.
दिलीप गांधींवर पंतप्रधान मोदीही नाराज
दिलीप कुमार मनसुखलाल गांधी हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. पंतप्रधान त्यांच्यावर नाराज होण्याचं कारणही तसंच आहे. आपल्याला मंत्रीपद द्यावं या मागणीसाठी गांधी यांनी एक शिष्टमंडळ दिल्लीला पाठवल्याचं बोललं जातंय. जैन खासदार असल्याने मंत्रीपद द्यावे अशी मागणी शिष्टमंडळाने केली होती. आधी पक्षाचं काम करा, नंतर मंत्रीपदाचं पाहू असं मोदींनी शिष्टमंडळाला बजावल्याची माहिती आहे. यामुळेच मोदी खासदार गांधींवर नाराज आहेत.