कल्याणमध्ये शाळेची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू
दरम्यान मुंबईची तुंबई झालेली असताना कल्याणमध्ये शाळेची भिंत घरावर कोसळून 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात एका 3 वर्ष चिमुकल्याचाही समावेश आहे.
ठाणे : गेल्या पाच दिवसापासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे मुंबईसह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी तुंबले. दरम्यान मुंबईची तुंबई झालेली असताना, मालाडमध्ये दोन भीषण दुर्घटना घडल्या आहेत. एका दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला असून तर दुसऱ्या दुर्घटनेत 2 जणांच मृत्यू झाला आहे. या दुर्घटना ताज्या असतानाच कल्याणमध्ये शाळेची भिंत घरावर कोसळून 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात एका 3 वर्ष चिमुकल्याचाही समावेश आहे.
कल्याणच्या दुर्गाडी भागात रात्री 12.30 च्या सुमारास नॅशनल उर्दू शाळेची सरंक्षक भिंत एका घरावर कोसळली. या दुर्घटनेत 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. करीना मोहम्मद चांद (26), शोभा कचरु कांबळे (60) या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर हुसैन मोहम्मद चांद या तीन वर्षीय चिमुकल्याचाही या दुर्घटनेत दुर्देवी मृत्यू झाला आहे.
तर आरती राजू कार्डिले (16) मुलगी यात जखमी झाली आहे. तिच्यावर रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गेल्या पाच दिवसांपासून सततच्या पावसामुळे मुंबई-ठाणे-पालघर परिसराला झोडपून काढले आहे. काल (1 जुलै) मुंबईसह ठाणे परिसरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. दरम्यान आज (2 जुलै) मुंबईतील किंग्ज सर्कल, साकीनाका, घाटकोपर, धारावी, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, सायन, कुर्ला, विक्रोळीसह अनेक ठिकाणी रस्त्यावर आणि घरात पाणी भरल्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. रेल्वे रुळांवरही पाणी भरल्याने मुंबईची लाइफलाइन असलेली रेल्वेही ठप्प झाली आहे.