भोरमध्ये शेतातली माती चोरीला, हायकोर्टाकडून सीआयडी चौकशीचे आदेश
भोरमध्ये चक्क शेतातील माती चोरीला गेली आहे. विशेष म्हणजे या मातीचोरीची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले (Bhor soil theft) आहेत.
पुणे : चोरीला काय जाऊ शकतं असा प्रश्न कोणाला विचारला तर हा काय प्रश्न आहे का? असा उलट प्रश्न करत एखाद्याला वेड्यात काढलं (Bhor soil theft) जाईल. पैसे, दागिने, मोबाईल, गाड्या या चोरीला जाणाऱ्या वस्तू…पण भोरमध्ये चक्क शेतातील माती चोरीला गेली आहे. विशेष म्हणजे या मातीचोरीची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले (Bhor soil theft) आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या जाऊ तिथं खाऊ या चित्रपटात विहीर चोरीला गेल्याचं कथानक आहे. या ठिकाणी मात्र प्रत्यक्षात शेतातील मातीचं चोरीला गेली आहे. सर्जेराव कोळपे या शेतकऱ्याच्या शेतातील संपूर्ण माती रात्रीत लंपास करण्यात आली होती. 2018 मध्ये हा सर्व प्रकार घडला. यानंतर सर्जेराव यांनी राजगड पोलीस ठाण्यात शेतातली माती चोरीला गेल्याची तक्रार दिली.
या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान बंधाऱ्याच्या कामासाठी शेतकऱ्याला न सांगता ना परवानगी घेता संपूर्ण शेतातील माती उकरून नेण्यात आल्याचे त्याला समजले. या प्रकरणी कोळपे कुटुंबाने पोलीस स्टेशन, पंचायत समिती, पाटबंधारे विभाग, तहसिल कार्यालय अशा सगळ्या शासकीय कार्यालयात दाद मागितली. अनेक तक्रारी केल्या. पण हाती काही आले नाही. त्यामुळे शेवटी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याप्रकरणी न्यायालयाने माती चोरी प्रकरणी सीआयडीचे आदेश दिले (Bhor soil theft) आहेत.
या संपूर्ण माती चोरी प्रकरणी उच्च न्यायालयात संबंधित अधिकाऱ्यांचा चुका आणि कोळपे शेतकऱ्याला दिलेली वागणूक न्यायालयात मांडण्यात आली. त्यावरून सीआयडी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
एखाद्या गंभीर गुन्ह्याचा उलगडा करून त्याचा छडा लावण्यासाठी सीआयडी चौकशीची मागणी केली जाते. पण राज्यात पहिल्यांदाच शेतातील माती चोरीप्रकरणी अशी चौकशी होणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मातीचोरीच्या गोष्टी चांगल्याच रंगू लागल्या (Bhor soil theft) आहेत.