जिल्ह्यात मी आणि एसपी हे दोनच गुंड : नांदेडचे जिल्हाधिकारी
नांदेडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटकरांनी जाहीर कार्यक्रमात जिल्ह्यात मी आणि एसपी हे दोनच गुंड असल्याचं वक्तव्य केलं आहे.
नांदेड : नांदेडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटकरांनी जाहीर कार्यक्रमात जिल्ह्यात मी आणि एसपी हे दोनच गुंड असल्याचं वक्तव्य केलं आहे (Collector Vipin Vitankar on goons). यानंतर सध्या नांदेडमध्ये याचीच चर्चा सुरु आहे. डॉ. विपीन इटनकर असं या जिल्हाधिकाऱ्यांचं नाव आहे. त्यांनी नुकताच नांदेडच्या जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी या दोन गुंडांनी गुंडागर्दी केली नाही, तर दुसरे गुंडे तयार होतात, असंही नमूद केलं. शुक्रवारी (28 फेब्रुवारी) रात्री मावळते जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचा निरोप समारंभ झाला. याच कार्यक्रमात नूतन जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर बोलत होते.
जिल्हाधिकारी विपीन इटनकर म्हणाले, “जिल्ह्यात केवळ दोनच गुंड असतात. एक म्हणजे जिल्हाधिकारी आणि दुसरा म्हणजे पोलीस अधीक्षक (एसपी). या दोन गुंडांनी गुंडागर्दी केली नाही, तर दुसरे गुंड तयार होतात. त्यामुळे अशाचप्रकारे मी आणि पोलीस अधीक्षक आम्ही दोघे गाडीच्या दोन चाकांप्रमाणे हा जिल्हा चालवू.”
VIDEO: जिल्ह्यात मी आणि एसपी हे दोनच गुंड : नांदेडचे जिल्हाधिकारी#Nanded pic.twitter.com/tKB8mjl5RO
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 29, 2020
जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींची तुलना थेट गुंडांशी केल्याने नांदेड जिल्ह्याचा कारभार येणाऱ्या काळात कसा चालेल, याविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. आता जिल्हा लोकशाही मार्गाने चालणार की ठोकशाही मार्गाने चालणार असाही प्रश्न नांदेडकरांकडून उपस्थित केला जात आहे. लोकशाही कारभारात जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख असतो. या शिवाय त्यांच्याकडे जिल्ह्याच्या दंडाधिकाऱ्याचीही जबाबदारी असते. ते अनेक प्रकरणात न्यायदानाचे कामही करतात. अशास्थितीत गुंडाच्या भूमिकेत शिरुन ते न्यायदान कसे करणार असाही प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.
जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी कार्यक्रमात रंगत वाढवण्यासाठी संबंधित वक्तव्य केलं असेल, तर हा नक्कीच गमतीचा भाग ठरेल. मात्र, त्यांनी याच पद्धतीने प्रत्यक्षात काम केल्यास नांदेडमध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळतील.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी एका कार्यक्रमात बोलताना मी काही हिरोपेक्षा कमी नाही, असं वक्तव्य केलं होतं. जिल्हाधिकाऱ्यांच्या या वक्तव्यानंतर नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचीही चर्चा आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक गुंड होत असतील, तर जिल्ह्यात अशोक चव्हाण नावाचा हिरो देखील आहे, अशीच काहीशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. तसेच अशोक चव्हाणांसोबत सत्तेचा समतोल राखत नांदेडकरांनी लोकसभा निवडणुकीत प्रताप पाटील नावाचा दुसरा हिरोही निवडून दिल्याचं बोललं जात आहे.
घोटाळ्यात अडकलेलं जिल्हाधिकारी कार्यालय
मागील काळात तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी नांदेडमध्ये सरकारी अन्नधान्याचा मोठा घोटाळा उघडकीस आणला होता. गोर गरीबांच्या तोंडचा घास हिरावून तो काळ्या बाजारात विकण्याच्या या घोटाळ्यात अनेक बडे मासे अडकल्याचं त्यावेळी उघड झालं. तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांचाही त्यात सहभागी झाल्याचं स्पष्ट झालं. यानंतर हेच वेणीकर मागील 8 महिन्यांपासून फरार असून सीआयडी त्याचा तपास करत आहेत. अन्य एक उपजिल्हाधिकाऱ्यावरही लाच घेतल्याचा आरोप आहे. जिल्ह्यातील अनेक महसुल अधिकाऱ्यांचे वाळू माफियांशी हितसंबंध असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. त्यामुळे घोटाळ्याच्या या मालिकेच्या पार्श्वभूमीवर नूतन जिल्हाधिकारी कसा लगाम घालतात हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Collector Vipin Vitankar on 2 goons in district